मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसीकोपरी गावातील लहान बाळांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटाईझरचे थेंब पाजले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.
पोलिओ डोस घेतलेल्या मुलांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्या आजाराचं निदान व त्यासंदर्भाने चौकशी करताना बाळांना हलगर्जीपणाने सॅनिटाईझरचे थेंब पाजले गेल्याचं उघडकीस आलं. हा प्रकार समजताच थेट जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेस जबाबदार धरून एका आरोग्य अधिकाऱ्यासहित अंगणवाडी सेविका व आशा वर्करला निलंबित करण्यात आलंय.
श्यामराव गेडाम यांच्या दोन मुलांनाही पोलिओ डोस पाजल्यानंतर उलटी झाली. दोन्ही मुलांना अस्वस्थताही वाटत होती. मूळात मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटाईझरचे थेंब दिले गेले होते. चूक लक्षात आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना माघारी बोलावलं आणि पुन्हा पोलिओ डोस पाजले.
प्रश्न केवळ गेडाम यांच्या मुलांचाच नव्हता तर एकूण बारा बाळं हलगर्जीपणाची शिकार झाली होती. सर्व बाळांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आलेत व सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ एकाच मुलाला उलटीचा त्रास झाला. तो पोलिओ डोसनेही होऊ शकतो. परंतु, खबरदारी म्हणून बाळांना शासकीय रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.
झाल्या प्रकाराची चौकशी तर करण्यात येत आहेच ; परंतु, घटना आश्चर्यजनकही आहे. भारतात पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम नव्याने होत नाहीये. प्रत्येक वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचं व सहाय्यकांचं प्रशिक्षण होतं.
पोलिओ डोसच्या बाटलीवर वॅक्सीन वायल माॅनिटर म्हणून ओळखलं जाणारं लेबल चिकटवलेलं असतं. जर डोस ठराविक तापमानाच्या संपर्कात आला तर या लेबलचा रंग बदलतो, ज्यावरून डोस वापरावा की वापरू नये, याचा निर्णय घेता येतो. त्यामुळे पोलिओ डोसऐवजी सॅनिटाईझर पाजण्याचा प्रकार फक्त नवख्या व अप्रशिक्षित कर्मचाऱ्याकडूनच होऊ शकतो. कोरोनाच्या भीतीने कर्मचाऱ्यांना सॅनिटाईझरने हात स्वच्छ ठेवण्याच्या सूचना होत्या, पण कोरोनाची भीती पोलिओ लसीकरणावर पाणी फिरवेल, याची कल्पना शासकीय यंत्रणेला नव्हती.
यवतमाळमधील घटना दडपून ठेवण्याच्या प्रयत्नात शासकीय यंत्रणा होती ; पण गावातील सरपंचाच्या कानावर हलगर्जीपणाची बाब गेल्यावर त्यानेच सगळी घटना चव्हाट्यावर आणली.