मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स सुरु केले होते. बाबासाहेब स्वतः या संस्थेचे संचालक होते व शां. श. रेगे रजिस्ट्रार होते. देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भारती व्हावी, ह्या हेतूने राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले होते. जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण केंद्रात बाबासाहेबांना करायची होती. शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आलं पाहिजे, त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक पाहिजे, विद्यालयाचा लौकिक शिक्षकाच्या कर्तुत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे बाबासाहेबांचे मत होते. १ जुलै ५६ ते मार्च ५७ पर्यंतच हे विद्यालय चालले. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन ते बंद पडले. संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्म तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भरून टाकू शकतो, तोच सभासद यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांचे उद्गार….ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स मध्ये राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर बाबासाहेबांनी वक्तृत्व साधनेला महत्व दिले होते. डिसेंबर ५६ मध्ये बाबासाहेब स्वतः या संस्थेत वक्तृत्वावर व्याख्यान देणार होते. पण त्यांच्या आकस्मिक परीनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ती संस्था व तिथले उत्सुक विद्यार्थी मुकले…
दर रविवारी कायद्याने वागाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग चालतात. त्या अंतर्गत कार्यकर्त्यांना वाचन, अभिवाचन, निवेदन, सूत्रसंचालन, लेखन, सोशल नेट्वर्किंग, पोस्ट बनवणे, लेखन करणे, भाषण करणे, समूह चर्चा, मतप्रदर्शन याबाबत मार्गदर्शन केले जाते.