मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
समाजाचा अविभाज्य घटक म्हणजे मानवी वस्ती आणि मानवी वस्तीचे अविभाज्य अंग म्हणजे कायदा.
खरे पाहता मनुष्याच्या उत्क्रांतीपासूनच कायद्याचे विशेष असे वेगळे स्थान आहे. तेव्हांपासून चालत आलेल्या प्रथा-परंपरा-व्यवहार ज्यांना आपण रुढी किंवा चालीरिती म्हणतो त्यांचे (ज्या कायदेशीर योग्य आहेत त्या)आजही कायद्यामध्ये स्थान आहे.
मधल्या काळात जेव्हा जगामधे मोठ्या प्रमाणात जवळ-जवळ जगातील सर्वच राष्ट्रांमधे राजेशाही अस्तित्वात होती, तेव्हा राजा ठरवेल तोच कायदा हे तत्व होते. कालांतराने यात जनतेच्या संघर्षामुळे बदल होत गेले, अन्याय-अत्याचारा विरोधात जनता एकत्र आली आणि जनतेच्या कल्याणाचे, जनतेने जनतेचा विचार करुन, सर्वांनुमते सलोख्याने एकत्र राहण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे लोकशाही.
लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य, कायद्याच राज्य म्हणजे प्रत्येक चुकीच्या व अनुचित बाबी, प्रथा, परंपरा यांना आळा बसून समाजात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील, याची दक्षता घेणारी व्यवस्था. कायदा म्हणजे अशा घटनांच संकेतन (Codification) ज्या समाजात घडल्या तर त्यामुळे समाजात अशांतता, अराजकता निर्माण होवु शकते, हे घडू नये म्हणून करण्यात आलेला प्रतिबंध.
आज आपण समाजात शांततेने जीवन जगू शकतो त्याच श्रेय हे अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांना आहे. त्या कायद्यांची अनेकदा आपल्याला माहिती नसते, पण जनतेच्या कल्याणासाठी ते कायदे करण्यात आलेले असतात. कायद्याच्या अज्ञानामुळे अनेकदा आपल्या सर्वांकडून चुका होतात. पण तो कायदा मला माहीत नव्हता, त्यामुळे माझ्याकडून चूक झाली, हा बचाव आपण घेवू शकत नाही. कारण, अस्तित्वात असणारा कायदा हा सर्व जनतेस माहित आहे, हे गृहितक कायद्याच्या (लोकशाही) राज्याचं आहे.
आपणास कायदा माहित नसल्यामुळे अनेकदा आपली फसवणुक होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपणास त्याचे ज्ञान असणे आता
काळाची गरज आहे. भारतीय जनतेची हीच गरज लक्षात घेवून राज असरोंडकर यांनी कायद्याने वागा ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली आहे.
साध्या सोप्या भाषेत सांगायच झालं तर आपण दाखल केलेला तक्रार अर्ज किती दिवसांमध्ये निकाली निघाला पाहीजे, आपल्या घराच्या बाजूला कचरा किंवा सांडपाणी किंवा गटारीचे घाण पाणी साचले असेल तर या संदर्भात नक्की कोणाकडे दाद मागायची , रोजच्या दैनदिन जिवनात असे अनेक प्रश्न आपणास भेडसावतात, पण याची उत्तरे ना प्रशासन देत ना आपले प्रतिनिधी, पण अशा सर्व प्रश्नांची उत्तरे हे आपल्या कायद्यामधे आहेत. याची माहिती सर्व सामान्य नागरिकांना झाली पाहीजे, म्हणुनच राज असरोंडकर यांनी कायद्याने वागा लोकचळवळ सुरु केली आहे.
आपल्या भारताचे संविधान हे भारतीय जनतेचे कल्याण आणि प्रत्येक भारतीय नागरीकाला त्याचे हक्क व अधिकार मिळालेच पाहिजेत, हा उद्देश समोर ठेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान सभेने लिहीले आहे. भारतातील प्रत्येक कायदा हा भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेले भारतीय नागरीकाचे स्वातंत्र्य याला अनुसरुनच अस्तित्वात येतो.
कायद्याने वागा लोकचळवळीचा उद्देशही प्रत्येक भारतीय नागरीकांचे कल्याण तसेच प्रत्येक भारतीय नागरीकांना त्यांचे कर्तव्य आणि हक्क व अधिकार याची जाणीव करुन देणे तसेच भारतीय समाजात धर्म, जात, पंथ याद्वारे फुट पडू नये म्हणुन सर्व नागरिकांनी सद्सद्विवेक बुध्दी जागृत ठेवून फुटीरतावादी राजकारणापासुन वेगळे होवून जनतेचा विकास करणारे जनतेचे प्रतिनिधी निवडून द्यावेत हा आहे.
– अॅड. भुजंग मोरे