मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आपली चळवळ, आपला मिडिया ही भूमिका कायद्याने वागा लोकचळवळ सुरू केली, तेव्हापासूनच डोक्यात होती.
समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर कायद्याने वागा लोकचळवळीने गेल्या दहा वर्षांत केला. जनजागृती म्हणजे आपलीच साचेबद्ध भूमिका मांडणं, पसरवणं, रेटणं हे आम्हाला मान्य नाही. आपल्या मंचावर विरोधी मतं मांडण्याचीही संधी असावी, ही जोखीम कायद्याने वागा लोकचळवळीने घेतली.
प्रशिक्षण शिबिरात सामील झालेल्या युवांनी त्याचा अनुभव घेतलाय. जातधर्मभाषाप्रांतापलिकडे आपल्या भोवतालच्या जगाकडे पाहण्याचं आणि तोच दृष्टीकोन ठेवत आपल्या प्रश्नांच्या निराकरणाचे प्रयत्न करण्याचं आमचं धोरण आहे.
विचारधारा भारतीय संविधान आहे आणि मार्ग अर्थातच संविधानिक आहेत ! देश, देशसेवा आणि देशभक्ती यातला नेमकेपणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणं आमचं काम ! शिक्षण, आरोग्य, परिवहन हे आमचे प्राधान्याचे विषय ! एका रात्रीत सगळा बदल झाला पाहिजे, याची जराही घाई नाही. बदलाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवून संयतपणे चळवळ काम करते.
टाळेबंदीच्या काळात असंच शांतपणे पत्रकारितेचं प्रशिक्षण राबवलं. ही पत्रकारिता केवळ बातमीदारी करणारी नाही. ती लोकांपर्यंत माहिती पोहचवणारी आहे. माहिती तथ्यपूर्ण असावी यासाठी धडपडणारी आहे. मांडणी सहजसुलभ असावी, हे पाहणारी आहे. संशोधन करणारी आहे. विषयांच्या मूळाशी जाणारी आहे. अव्यवस्थेला जाब विचारणारी आहे.
सध्या मिडिया भारत चं फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट इथून काम सुरू आहे. हे नुसतं माध्यम नाही लोकमाध्यम आहे. कायद्याने वागा लोकचळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आणि कार्यकर्त्यांमार्फत चालवलेलं मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम ! पुढचं इतक्यातच नाही सांगत…दिशा आणि मार्ग ठरलेला आहे ; बघुया कशी वाटचाल होतेय ती…आपण सर्व सोबत आहातच !
कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक आणि मिडिया भारत न्यूज चे संपादक