मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. ही महाराष्ट्राला हादरवणारी आणि जाहीर असलेली शेतकर्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आत्महत्येनंतर सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस काहीतरी करेल, असा आशावाद करपेंच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत होता ; पण तसं होणं दूरच, त्यानंतर आत्महत्यांची साखळीच महाराष्ट्राने पाहिली.
साहेबराव करपे अकरा वर्षं सरपंच राहिलेले. उत्तम भजन करायचे. ४० एकर शेतीचे मालक. पण १५ एकराचं उभं पीक वाळलं आणि हादरले. कर्ज फेडण्याच्या विवंचनेने चिंतित झाले. मनाने खचले. त्याची परिणती दोन मुलं व दोन मुली अशा चार लहानग्यांसह एक हासतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त होण्यात झाली होती.
या दिवशी शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱयांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी, असंख्य लोक एक दिवसाचा वैयक्तिक उपवास करतात! दर वर्षी एके ठिकाणी विशेष कार्यक्रम केला जातो. या वर्षी साहेबराव करपे यांच्या गावी (चिल गव्हाण, ता. महागाव, जि यवतमाळ) येथे जमून श्रद्धांजली व्यक्त करावी, असा निर्णय किसानपुत्रांनी केला असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील.
ज्याला सहवेदना व्यक्त करायची आहे, असा कोणीही व्यक्ती त्यात सामील होऊ शकतो, असे किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी सांगितले.
करपेंच्या आत्महत्येनंतर शेतकऱ्यांसाठी सुयोग्य धोरण बनणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. किमान शेतकरीविरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या मार्गातील अडथळे तरी दूर झाले पाहिजेत, अशी किसानपुत्र आंदोलनाची मागणी आहे.
नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं, कारण गांधी असते तर शेतकरीविरोधी कायदे त्यांनी बनूच दिले नसते, असं किसानपुत्र आंदोलनाचे संस्थापक अमर हबीब यांचं मत आहे.
१९ मार्च २१ रोजी चिल गव्हाण येथे सकाळपासून लोक जमणार आहेत. तेथे दिवसभर विविध कार्यक्रम चालतील. दुपारी ३ वाजता सभा होईल. सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता केली जाईल. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब व अनंत देशपांडे यांनी दिली आहे.