मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
पीडित कुटुंबाचा पोलिस ठाण्यासमोर स्वत:ला जाळून घेण्याचा इशारा !
महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत उदासीनता दाखवल्याबद्दल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. बीड जिल्ह्यातील दिंद्रुडमधील एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्यांनी विरोध झाल्यावर सदरच्या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांनाच मारहाण केल्याच्या ताज्या घटनेचा संदर्भ चित्रा वाघ यांच्या आरोपांना आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार राजाश्रय देत आहे, असा घणाघाती आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील देव दहिफळ गावात साखरे आणि बडे यांची शेती लागून आहे. पीडित कुटुंब दिंड्रुडचं आहे. पण त्यांची शेतजमीन देव दहिफळला आहे. पीडीत महिलेचे सासूसासरे शेतातच राहतात. तिथे लगतचे शेतमालक बडेंसोबत बांधावरून वाद आहेत. या कुटुंबाचं आपसात यापूर्वीही भांडण झालेलं आहे. पीडीत महिलांच्या अपंग सासऱ्यांना त्यात मारहाण झाली आहे. यावेळी मात्र महिलांनाच लक्ष्य करण्यात आलंय.
ताज्या घटनेत साखरे कुटुंबातील नात्याने जाऊ असलेल्या दोघीजणी सकाळी शेतात खुरपणी साठी गेलेल्या होत्या. दुपारी शेजारच्या शेतात सुनील बडे आलेला होता. त्याने यातील एका महिलेशी छेडछाड केली व तुझा नवरा बाहेरगावी असतो, तू माझ्या सोबत चल असं म्हणत, तिचा हात धरला.
त्यावरून संबंधित महिलेने विरोध केला. तिची जाऊही धावून आली. झालेला आरडाओरडा ऐकून महिलांचे सासू सासरे व मुलगे शेताकडे धावले. मात्र बडे कुटुंबातील सदस्यांनी उलट साखरे कुटुंबीयांनाच मारहाण केली, अशी तक्रार दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सदर प्रकरणात दिंड्रुड पोलिस ठाण्यात, सुनिल सुदाम बडे, दिलीप सुदाम बर्डे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषराव बडे व बंडू बडे यांच्याविरोधात भादंवि 143, 147, 148, 149, 324 354 तसंच अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम मधील कलम 92 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रज्ञा पुंडगे यांनी दिली.
मात्र या नंतरच्या घडामोडी संतापजनक आहेत. तक्रारदार पीडित कुटुंबियांविरोधातच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, असं ऐकण्यात आल्याची माहिती साखरे कुटुंबातील पीडीत महिलेच्या पतीने मिडिया भारत न्यूज ला दिली. आमच्यावरच जर पोलिससुद्धा अन्याय करणार असतील तर शेवटी नाईलाजास्तव आम्हाला पोलिस ठाण्यासमोर स्वत:लाच पेटवून घ्यावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
प्रत्येक सरकारमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडत असतात, परंतु घटना घडल्यावर सरकार त्या कशा पद्धतीने हाताळतं, त्यावरून सरकारची संवेदनशीलता दिसून येत असते, असा हल्ला चित्रा वाघ यांनी चढवला आहे.
सदर बातमीचा विडिओ इथे पाहा :