मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये सामुहिक बलात्काराचा एक विडिओ व्हायरल झाला. चार पुरूष आणि एक महिला एका युवतीला अत्यंत क्रूरतेने छळतानाचा तो विडिओ मानवी संवेदना जागृत असलेल्या कोणाचाही संताप व्हावा, असा आहे.
सुरूवातीला राजस्थानात जोधपूर मध्ये झालेल्या नागा युवतीच्या आत्महत्येच्या घटनेशी तो विडिओ जोडला गेला. आसाम पोलिसांनी या विडिओची अत्यंत गंभीर दखल घेतली. घटना आसामबाहेरचीही असू शकते, हे गृहित धरून त्यांनी देशभरातील पोलिसांना घटनेचा छडा लावण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. माहिती देणाऱ्याला बक्षीस घोषित केलं. विडिओ तील स्क्रीनशॉटवरून आरोपींची छायाचित्रं प्रसारित केली.
सखोल तपासात आढळलं की विडिओचा मूळ स्त्रोत कर्नाटकातील बंगळुरूतील आहे. कर्नाटक पोलिसांना ही माहिती प्राप्त झाल्यावर त्यांनी मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेत सहा आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. पीडिता दुसऱ्या राज्यात आहे व तिचा शोध जारी आहे.
ताबडतोब ट्वीटरवर आरोपींचं बांगलादेशी कनेक्शन जोडत विद्वेषाचे पतंग उडायला सुरुवात झाली. बांगलादेशमधून घुसखोर आसाम/पश्चिम बंगालमार्गे भारतात येऊन ते बंगळुरू पर्यंत पोचले, बलात्कार केला, म्हणून एनआरसी/सीएए ची आवश्यकता आहे, वगैरे वगैरे ‘अजेंडायुक्त’ ट्वीट पडू लागले.
प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपी मजूर आहेत. ते भारतीय आहेत की बांगलादेशी, कर्नाटकी आहेत की आसामी/बंगाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बांगलादेशी असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पीडीत युवती बांगलादेशी आहे व कामधंदा देण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला बोलावून वेश्याव्यवसायात ढकललं होतं. संधी साधून ती पळालीही होती. पण आरोपींनी तिला हुडकलं, तिचा लैंगिक छळ केला आणि विडिओ काढून तो पसरवला.
सागर, मोहंमद बाबा शेख, रिडाॅय बाबू आणि हकील अशी आरोपींची नावं असल्याचं वृत्त द हिंदू ने दिलंय.
पुढील तपासात अजून माहिती बाहेर येईल. आरोपी भारतीय असोत की बांगलादेशी, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, ही जगभरातील कोणाही संवेदनशील लोकांची अपेक्षा असणार !
ज्या वेगाने आसाम, कर्नाटक आणि इतर पोलिसांनी सूत्रं हालवली, ती कौतुकास्पद आहेत. पण तितक्याच वेगाने, संपूर्ण सत्य बाहेर पडायचा आतच, विद्वेषाचा धार्मिक अजेंडाही रेटण्याचा सवयीचा घृणास्पद प्रयत्न झाला. अत्याचारांच्या घटनांइतकीच ही दुर्गंधीयुक्त धर्मांधताही भारताची डोकेदुखी झालीय.