मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
निवडणुकीचा उमेदवारी अर्ज उभं राहण्याचा नसून, तो मतदारांनी त्यांच्या निवडीनुसार उभं करण्याचा असतो. ते नामनिर्देशन असतं. लोकांनी उमेदवार निवडावा, त्याला किंवा तिला नामनिर्देशित करावं, त्यांचा प्रचार करावा आणि निवडून आणावं, ही खरी आदर्शवत पद्धत ! ती राबवली गेली तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होईल व निवडणुकांच्या अवाढव्य खर्चालाही आपोआप आळा बसेल, असं प्रतिपादन कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी केलं.
१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मुंबई आमची, सामान्य माणसांची’ या अभियानाची सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून अभियानाच्या भूमिकेचे पोस्टर प्रकाशित करून करण्यात आली. या अभियानाचा भाग म्हणून ५ मे २०२१ रोजी दुसरे ऑनलाईन सत्र संपन्न झाले. या सत्रात कायद्याने वागा या चळवळीचे मुख्य समन्वयक आणि माजी नगरसेवक मा.राज असरोडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्रामुख्याने मतदाता आणि मताधिकार म्हणजे काय? निवडणुकीत पैसा लागतो का? नागरिकांची खऱ्या अर्थाने काय जबाबदारी आहे? एकूणच मुंबई महानगरपालिका आणि प्रशासकीय यंत्रणा कसे कार्य करते? आणि निवडणूक पद्धत? बजेट, लोकसहभाग यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर असरोडकर यांनी आपली भूमिका मांडली.
या सत्राचे संचालन मा.प्रा.डॉ.प्रभा तिरमारे यांनी केलं. राज असरोडकरांसारखे नेतृत्व येत्या काळात निर्माण झालं पाहिजे अश्या प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आणि असरोडकरांचे आभार मानले.
सारांश सहभाग म्हणून वर्षा विद्या विलास यांनी भूमिका पार पाडली. ‘मुंबई आमची सामान्य माणसाची’ हे आता अभियान न राहता त्याला चळवळीचे स्वरूप दिले पाहिजे, अश्या स्वरूपाची भूमिका यावेळी वर्षा विद्या विलास यांनी मांडली. तसेच निर्मला निकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी निलेश राठोड यांच्या प्रमुख सहकार्याने हे चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, यासाठी संविधानिक लोकदबाव निर्माण व्हावा, यासाठी सुरू केलेल्या अभियानात सहभागी होण्यासाठी 9869289433 / 9867621104/9769073888 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
केशव हिंगाडे
खुप उपयुक्त माहिती