महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेत झालेली दुफळी चव्हाट्यावर आली. शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू झाल्यानंतरही न डगमगता उद्धव ठाकरेंनी शांतपणे शिवसेनेच्या पुनर्रचनेचे काम महाराष्ट्रभर सुरू केले आहे. उल्हासनगरात शिवसेना बळकट करण्यांंत महत्वाची भूमिका निभावलेल्या चंद्रकांत बोडारे यांची कल्याण जिल्हाप्रमुखपदी नेमणूक घोषित झाली आहे. यामुळे कल्याण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
१९९३ च्या काळात शहरप्रमुख ते कामगार संघटनेच्या जबाबदारीतून चंद्रकांत बोडारे यांनी उल्हासनगरात शिवसेना रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या कारकिर्दीत आक्रमक मोर्चे आंदोलनं यातून अनेक प्रश्नांंत शिवसेनेची निर्णायक प्रतिमा चंद्रकांत बोडारे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली आहे.
या आधीही कल्याण उपजिल्हाप्रमुखपदाच्या जबाबदारीतून त्यांनी शिवसेना उल्हासनगर, अंबरनाथ, मलंगगडच्या खेडोपाडी आणि वाड्यावस्थांमध्ये शिवसेनेचा विस्तार केलाय.
माजी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर रिक्त झालेल्या पदी उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत बोडारे यांची नियुक्ती केलीय. यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेय.
आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विस्कटू पाहणाऱ्या पक्षाची घडी पुन्हा एकदा कल्याण जिल्ह्यात मजबूत करणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत बोडारे यांनी व्यक्त केली.