मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राजस्थानात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय उलथापालथीची शक्यता निर्माण झाल्यानंतरही काँग्रेसने पायलट यांच्यासोबत तडजोडीचा पर्याय नाकारला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याच नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत १०७ आमदार उपस्थित होते, असा दावा पक्षाने केलाय. काँग्रेसकडे पक्षीय व पाठींबा दिलेल्या इतर पक्षांच्या आमदारांसहित १२५ चं संख्याबळ होतं. पायलट यांच्या बंडखोरीमुळे ते खाली घसरलेलं असलं तरी अजुनही काँग्रेसकडे बहुमत शाबूत असल्याचं दिसत आहे.
भाजपाकडे मित्रपक्ष मिळून ७५ चं संख्याबळ आहे. विधानसभेत साध्या बहुमतासाठी १०१ चा आकडा गाठणं गरजेचं आहे.
आधी कर्नाटक व ऐन कोविड संकटात मध्यप्रदेशातलं सरकार पाडल्यानंतर आता राजस्थानाकडे भाजपाने आपला मोर्चा वळवला आहे. नेहमीप्रमाणे आयकर धाडींचं अस्त्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बाहेर काढल्याचं दिसत आहे. आमदारांवर कोणताही दबाव येऊ नये, यासाठी काँग्रेसने आमदारांना एका हाॅटेलात हलवलं आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेश कार्यालयावरून सचिन पायलट यांची पोस्टर्स हटवण्यात आली आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये राजस्थानातील कोविड प्रतिबंधक उपाययोजना वाऱ्यावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.