मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
अंतर्गत दळणवळण वाढवून गावांचा एकात्मिक विकास झाला पाहिजे आणि स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट तालुके तयार झाले पाहिजेत, असं प्रतिपादन महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक विश्लेषक सुनील कदम यांनी केलं आहे.
कोरोनानंतरचा काळ आर्थिक पुनर्रचनेचा असणार आहे, जिथे प्रत्येकाला सावरण्याची संधी मिळणार आहे, मात्र आपल्याकडे तशी क्षमता असली पाहिजे, असंही सुनील कदम यांनी म्हटलं आहे.
कायद्याने वागा लोकचळवळीने आयोजित केलेल्या ” कोविडसंसर्ग : सद्यस्थिती आणि पुढचा प्रवास” या विषयावरील थेट संबोधनात सुनील कदम यांनी कोरोनाची सुरूवात, वाढता प्रादुर्भाव, आणि सामाजिक-आर्थिक स्तरावरील संभाव्य पुढील परिणाम याबाबतचा आढावा घेतला.
कोरोना फैलाव रोखण्यासाठीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाॅकडाऊन आवश्यक होतं, हे मान्य केलं तरीही त्यात कोणतंही पूर्वनियोजन नव्हतं, असा आरोप करीत सुनील कदम यांनी लाॅकडाऊनदरम्यान उद्भवलेल्या गोंधळाला केंद्र सरकारला जबाबदार धरले.
जगाने कोरोनाचा मुकाबला करायला सुरुवात केली तेव्हा नरेंद्र मोदी नमस्तेट्रम्प ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त होते. मध्यप्रदेशातलं सरकार पाडण्यातही त्यांनी वेळ घालवला. पुढे थाळी वाजवा, दिवे लावासारखे ढोबळ कार्यक्रम दिले. पण ठोस वैद्यकीय उपाययोजना मात्र केल्या नाहीत, असं सुनील कदम म्हणाले.
केंद्र सरकारच्या लाॅकडाऊन निर्णयात देशातील तळागाळातील घटकांचा विचारच केला गेला नाही, त्याचं कारण देशात पूर्वापार चालत असलेली जातीयवादी मानसिकताच असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला.
देशातली एक मोठी लोकसंख्या जगण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहिली, ही आपली देश म्हणून मोठी चूक ठरल्याचं सांगून सुनील कदम यांनी युवकांना आवाहन केलं की पुढील काळात नोकरी जरी शाश्वत नसली तरी तुमच्यातली लायकी, बुद्धिमत्ता, क्षमता आणि सोबत नाविन्यपूर्णताच तुम्हाला जगवणार आहे, याचं भान असूद्या.
News By Praful Kedare