नवनीत राणांविरोधात कल्याणात फौजदारी तक्रार ! शिवसेना पदाधिकारी आशा रसाळ यांची गुन्हा दाखल करायची मागणी !

नवनीत राणांविरोधात कल्याणात फौजदारी तक्रार ! शिवसेना पदाधिकारी आशा रसाळ यांची गुन्हा दाखल करायची मागणी !

नवनीत राणांविरोधात कल्याणात फौजदारी तक्रार ! शिवसेना पदाधिकारी आशा रसाळ यांची गुन्हा दाखल करायची मागणी !

नवनीत राणा यांनी ६ एप्रिलला अमरावतीत हनुमान जयंतीच्या उत्सवात केलेलं भाषण त्यांना अडचणीत आणणारं ठरलं आहे. महाविकास आघाडीच्या, उद्धव ठाकरेंच्या सभा जिथे होतील, त्या जागांचं शुद्धीकरण करण्याचं राणा यांनी केलेलं आवाहन त्यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल होण्यास कारणीभूत ठरलं आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक आशा रसाळ यांनी नवनीत राणांविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय.

नवनीत राणांच्या त्या वक्तव्यानुसार त्या अश्या म्हणाल्या आहेत की, जिथे जिथे महाविकास आघाडी तर्फे सभा होतील. उद्धव साहेब भाषण करतील. तिथे तिथे सभेनंतर त्या त्या जागेवर शुद्धीकरण करण्यात येईल. त्या अपवित्र जागा पवित्र करण्यात येतील. खासदार नवनीत राणा सभेला जमलेल्या सर्व जाती-धर्मातील लोकांबद्दल भेदभाव करत आहेत, अशी आशा रसाळ यांची तक्रार आहे. नवनीत राणा ह्यांचे जात प्रमाणपत्र मा. उच्च न्यायालयाने बनावट ठरवलेले आहे. तांत्रिक बाबींच्या आधारे त्या पदावर कार्यरत आहेत आणि भारतीय संविधानातील तरतूदींच्या विपरीत वक्तव्ये करीत आहेत, असं रसाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा उपासनांचं स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धा उपासनेच्या पद्धती विभिन्न असू शकतात. अमुकतमुक श्रद्धांवर विश्वास नाही, म्हणून कोणाही नागरिकांना समाजातून अलिप्त पाडण्याचा प्रयत्न संविधानाशी विसंगत आहे, तो संविधानद्रोह म्हणजेच राष्ट्रद्रोह आहे. नवनीत राणा त्यांच्या श्रद्धांशी सहमत नसलेल्या नागरिकांना देशातून वेगळं पाडू पाहताहेत. अपवित्र ठरवू पाहताहेत. ही कृती अस्पृश्यता जपणारी आहे, असा आशा रसाळ यांचा आरोप आहे.

जात, धर्म, भाषा, रंग, लिंग अशा कुठल्याच कारणांवरून भेदभावास मज्जाव करणाऱ्या अनुच्छेद १५ शी विसंगत नवनीत राणा यांचं वक्तव्य आहे. शिवाय ते धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या अनुच्छेद २५ शी सुद्धा विसंगत आहे. नवनीत राणा यांचं वक्तव्य विद्वेषपूर्ण आहे, ज्याची पोलिसांनी स्वत:हून दखल घेणं गरजेचं आहे. तसं न केल्यास नवनीत राणांच्या श्रद्धा बाळगण्याच्या उन्मादी पद्धतीशी सहमत नसलेल्यांवर हल्ला करण्यासाठी धर्मांध झुंडी प्रवृत्त होऊ शकतात व त्यातून कायदासुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती रसाळ यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केलीय.

नवनीत राणा यांनी देशाच्या संविधानिक व्यवस्थेलाच आव्हान दिलं असून, त्यांची कृती उघडपणे देशद्रोहाची आहे. भेदभावाला उत्तेजन देणारी आहे. विद्वेष पसरवणारी आहे. इतरांच्या धर्मभावना दुखावणारी आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्यास व कायदासुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून बेजबाबदार वर्तनाची आहे.

 

नवनीत राणा खासदार असल्या तरी संविधानातील आर्टिकल १४ नुसार भारतातील सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. नवनीत राणांचं वक्तव्य त्यांच्याविरोधात कठोरातील कठोर कलमांखाली गुन्हा दाखल होण्याचं सबळ कारण आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आपलं देशाप्रती आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावावं, अशी मागणी आशा रसाळ यांनी पोलिसांकडे केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलंय. सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिल्याने त्यांची खासदारकी शाबूत आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकण्यास उत्सुक आहे. मात्र, महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता सरकार राणांविरोधात कितपत भूमिका घेईल, याबाबत साशंकता आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपाला नवनीत राणा हव्या आहेत. त्यांची कडवट हिंदुत्ववादी वक्तव्ये भाजपाई राजकारणाच्या पथ्यावर पडणारी आहेत.

तक्रारदार आशा रसाळ यांच्या सरकारविरोधातील एका पोस्टवरून त्यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच पोलिस ठाण्यात नवनीत राणांविरोधात तक्रार देऊन रसाळ यांनी सरकारवर पलटवार केलाय. आता त्या तक्रारीवर पोलिस काय भूमिका घेतात ते उत्सुकतेचं ठरणार आहे. रसाळ यांची तक्रार नाकारायची तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांना सबळ कारण द्यावं लागणार आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!