मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
दिल्ली- देहरादून राज्यमहामार्गाच्या विस्ताराला मंजुरी तर मिळाली, मात्र या विस्ताराला स्थानिक पर्यावरण प्रेमींचा जोरदार विरोध होताना दिसतो आहे. त्याला कारणही ठोस आहे या महामार्गाचा विस्तार हा दोन अभयारण्यातून जाणारा आहे आणि त्यासाठी तब्बल २५०० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.
सदर महामार्गाचा २० किलोमिटरचा मार्ग हा राजाजी वाघा संरक्षण आणि शिवालिक हत्ती संरक्षण अभयारण्याच्या मधून जाणारा आहे. राजाजी वाघांसाठी रिजर्व असलेले अभयारण्य तब्बल 1,075 वर्ग किलोमीटर विस्तृत पसरलेले आहेत. सध्या तेथे १८ वाघ अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर अस्वल, गेंडा, ५० प्रकारचे वेगवेगळे प्राणी, ३०० प्रकारचे पक्षी तेथे वास्तव्य करतात. जर हा राज्यमहामार्ग या अभयारण्यातून गेला तर येथील जैवविविधतेच फार मोठ्ठं नुकसान होणार आहे, असं स्थानिकांच म्हणणं आहे.
याच बरोबर शिवालिक अभयारण्य हत्तींच्या संरक्षणांसाठी ओळखला जाते. याचे क्षेत्रफळ ५००० वर्ग किलोमिटर इतका विस्तारलेलं आहे. या महामार्गामुळे या अभयारण्यातील ४५ हेक्टर जंगल नष्ट करावे लागणार आहे.
केवळ १० मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी उत्तराखंड मध्ये असलेल्या या नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठा ऱ्हास होणार आहे. राज्य सरकारांना प्रवासाचा वेळ वाचवायचा आहे की या माध्यमांतून कोणाला फायदा पोहचवायचा आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विकासाचा अधिकचा भार आणि नियोजनशून्यतेचा परिणाम उत्तराखंडला या अगोदरही भोगावा लागला आहे. महत्वाकांक्षी चारधाम सडक परियोजना आणि ग्रांट विमानतळ निर्माण या दोन प्रकल्पासाठी प्रचंड झाडांची कत्तल होणारच आहे; त्यात हा महार्गाचीही भर पडली आहे.
जर अशीच झाडांची कत्तल होत राहिली तर तेथील मृदा कमकुवत होऊन भूसख्लन सारख्या घटनांचा सामना करावा लागणार असल्याच पर्यावरणवाद्यांच म्हणणं आहे.
२०१३ ला उत्तराखंड मध्ये आलेल्या महापुरात जवळपास ५००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. येणाऱ्या काळत पर्यावरणपूरक विकास नाही झाला तर उत्तराखंडची नैसर्गिक साधनसंपत्ती अधिक वेगाने नष्ट होणार हे नक्की.
विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा :