मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मोकळ्या निवांत जागा शहरांतून गायब झालेल्या आहेत. नियमित सकाळफेरी करावी, तर कुठे असा प्रश्न लोकांना पडतो. मोजक्या शहरातच नागरिकांसाठी एखादं विसाव्याचं ठिकाण असतं. डोंबिवली पश्चिमेला मोठा गाव येथील खाडी परिसर डोंबिवलीकरांसाठी फेरफटका मारायला हक्काचं ठिकाण आहे खरं, पण तिथल्या अस्वच्छतेमुळे ल़ोक हैराण आहेत. कायद्याने वागा लोकचळवळीने याबाबत आवाज उठवलाय.
कायद्याने वागा लोकचळवळीचे कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्र समन्वयक दीपक परब यांनी सदरच्या प्रश्नाबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांना लेखी निवेदन सादर करून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.
जुनी डोंबिवलीतील मोठागाव येतील खाडी किनारा व गणेश घाटावरील अस्वच्छतेबाबत मिडिया भारत न्यूज ने वाचा फोडल्यानंतर त्याची दखलही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांनी घेतलीय.
कायद्याने वागा लोकचळवळीच्या मागणीला कोकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण स्वतः सदरच्या गणेश घाटाच्या ठिकाणी स्थळभेट देणार असून लवकरच स्वच्छता मोहिम व कायमस्वरूपी उपाययोजनांची आखणी करू, असं कोकरे यांनी दिपक परब यांना सांगितलं.
सकाळ-संध्याकाळ मोठ्या संख्येने लोक मोठा गाव खाडीकिनारी फिरायला येतात. त्यात स्त्रियांची संख्या लक्षणीय असते. या ठिकाणी गणेशघाट विकसित करण्यात आलाय. नागरिकांना निवांत बसायला विसावाशेड उभारण्यात आलीय. बसायला बाकडे आहेत. झाडांभोवती पार आहेत. पण दोन गोष्टींचा इथे अभाव आहे. स्वच्छता व सुरक्षा !
सदरचा गणेश घाट म्हणजे नागरिकांचा कचरा आणि निर्माल्य टाकण्याचा अड्डा बनलाय. हा कचरा प्लास्टिक पिशव्यांतून येतो. त्यामुळे खाडीकिनारी आणि गणेश घाटाच्या पायऱ्यांवरही घाणीचं साम्राज्य आहे. कधी कधी तिथे बसवत नाही, अशी दुर्गंधी असते.
आता गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश घाटावर साफसफाई, डागडूजी, रंगरंगोटी केली जाईल, पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव ओसरले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या परिस्थिती असते. केवळ गणेशघाटच नव्हे तर खाडीकिनारचा हा संपूर्ण परिसर सुरम्य होऊ शकतो का? इथे कायमस्वरूपी स्वच्छता, पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह, व्यायाम साधनं, बाग अशा सुविधा केल्या जाऊ शकतात का?
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक आमदार, खासदार इकडे लक्ष देतील ? कायद्याने वागा लोकचळवळीचा हा सगळ्यांना सवाल आहे.
संबंधित विडिओ इथे पाहा :
Alka
डोंबिवली पश्चिमेला सुंदर असा खाडी किनारा लाभला आहे . त्यावर महापालिकेने तीन ठिकाणी सुंदर असे घाट देखील बांधलेले आहेत . मात्र त्या तिन्ही ठिकाणी घाणीचे साम्राज्य असते. स्वच्छता, नेटकेपणा नावालाही नसतो. या तिन्ही घाटात जुनी डोंबिवली येथील गणेश घाट हा सर्वाधिक गलिच्छ असतो. इथे श्राद्ध आदी विधी होत असतात. पण ते झाल्यावर स्वच्छता केली जात नाही. रोजचे निर्माल्य आणून टाकणारे लोक खूप. ते प्लास्टिक सह कचरा फेकतात. तोच कचरा खाडी पुन्हा घाटावर आणून परत फेकते. त्याची सफाई रोजच्या रोज होत नाही.शिवाय दारूच्या फुटलेल्या, फोडलेल्या बाटल्या असतातच.
मध्यंतरी पुर सदृश स्थितीत बराच गाळ चिखल घाटावर येऊन पसरला होता. तो अनेक दिवस तसाच होता. त्याची साफसफाई जवळपास दोन aathavadya नंतर झाली .
तिन्ही घाट आणि घाटाकडे जाणारे रस्ते फक्त स्वच्छ राहू दे . तेवढे झाले तरी नागरिक दुवा देतील .