मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
उपाययोजना करताना लोकांची उपजिविकेची साधनं हिरावली जाता कामा नयेत, असं प्रतिपादन भारताचे माजी प्रधानमंत्री व जागतिक अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेचं जे नुकसान झालं आहे, ते टाळण्यासाठी सरकारनं तातडीनं तीन पावलं उचलायला हवीत, असं मनमोहन सिंह यांनी सरकारला सुचवलं आहे.
कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यान अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या चक्राबद्दल बीबीसीने डॉ. सिंह यांच्याशी संवाद साधला.या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, आगामी काळात अर्थव्यवस्थेची चाकं रुळावर आणायची असतील तर सरकारनं तीन पावलं उचलायला हवीत.
पहिलं म्हणजे सरकारनं लोकांच्या उपजीविकेची साधनं हिरावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. योग्य प्रमाणात थेट आर्थिक मदत करून त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढवायलाही मदत करणं गरजेचं आहे.
उद्योगांना पुरेसं भांडवल कसं मिळेल याचा सरकारनं विचार करायला हवा. त्यासाठी सरकारी पाठबळ असलेली कर्ज पुरवठा योजना उपयोगी ठरु शकते.
संस्थात्मक स्वायत्तता देऊन वित्तीय क्षेत्राला गती दिली जाऊ शकते.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या सूचनांना केंद्र सरकारकडून कसा प्रतिसाद मिळतो, ते आता पाहावं लागणार आहे.