धर्मवीर आनंद दिघे साहेब हे जसे माझे गुरू तसेच ते तुमचे ही गुरु त्या अर्थाने "एकनाथ राव" तुम्ही माझे गुरुबंधू !!
आज मला दिघे साहेबांसोबत व्यतित केलेल्या दिवसांची आठवण होत आहे, ज्या काळी तुम्हीं ठाण्यात एका विभागात शाखाप्रमुखपदी होतात आणि मी उल्हासनगरात शाखाप्रमुख होतो.
धर्मवीरांच्या आदेशानंतर तुमचा ठाण्यात, माझा उल्हासनगरात प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग, धर्मवीरांच्या एका इशाऱ्यावर काहीही करायची तयारी !!
पुढे तुम्हीं नगरसेवक झाल्या नंतर "राजकारणात" जास्त सक्रिय झालात.
धर्मवीर गेल्यानंतर ज्या तडफेने तुम्ही संघटना सांभाळी त्याचा प्रत्येक शिवसैनिकाला अभिमान वाटत होता. पण हळूहळू तुम्हीं आपली स्वतःची छाप सेनेवर, संघटनेवर टाकायला सुरुवात केलीत.
प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःच्या समर्थकांची वर्णी लावायला सुरुवात केलीत. प्रत्येक शहरावर आपल्या समर्थकांना पदाधिकारी म्हणून नेमणूक करायला सुरुवात केलीत.
तिथपर्यंत तर ठिक होते पण आज जे झालं ते आपल्या "गुरूंना" तरी आवडलं असतं का ?
मला कल्पना आहे, तुमचं हे बंड अचानक झालेलं नाही. तुमची बरीच हेटाळणी झाली असणार. तुम्हांला काय काय त्रास झाला असेल तेही कळतंय आम्हांला. ज्या अर्थी तुम्हीं एवढा टोकाचा निर्णय घेतला त्या अर्थी तुमची घुसमट सहन करण्यापलिकडेच झाली असणार हे नक्की.
तुमच्या अशा निर्णयामुळे आपण सर्वांनी मिळून जी बाळासाहेबांची, धर्मवीरांची शिवसेना उभी केली ती "दोन चार वाचाळ घरभेदीं" मुळे अजून संकटात येईल. हे ना धर्मवीरांना आवडणार ना बाळासाहेबांना !!
माझी तुम्हांला एक गुरुबंधू म्हणून विनंती... बंड करा, नक्की करा ; पण शिवसेनेत राहूनच..त्या वाचाळ घरभेदींच्या विरोधात करा ! बाळासाहेबांना पण " षंढ नव्हें तर बंड" करणारा शिवसैनिक आवडत असे.
अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसैनिकच राहून उध्दवजींच्या सोबत सेनेतील घाण दूर करुन पवित्र करा. सच्चा शिवसैनिक अजूनही तुमच्या सोबत आहे ह्याची जाणीव असू द्या.
जय महाराष्ट्र !
विलास जयंत देशपांडे
शिवसैनिक ( ठाणे )
vilasjd@yahoo.com