मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या शाईने त्या प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कातडीला इजा झाल्याचे प्रकरणं समोर आली आहे. कल्याणातील एका शिक्षिकेने सदरबाबतचे फोटोज कायद्याने वागाकडे पाठवले आहेत. सदरचे फोटो आपण शिक्षकांच्या ग्रुप मध्ये पोस्ट केले असता, इतरांनीही तशा तक्रारी केल्याचं व फोटो पोस्ट केल्याचं या शिक्षिकेचे म्हणणं आहे
यापूर्वी आपण अनेकदा निवडणूक कर्मचारी म्हणून काम केलं आहे, पण अशा प्रकारचा त्रास झालेला नव्हता, असं स्पष्ट करतानाच यावेळी मात्र काम करत असतानाच बोटांना काहीशी खाज व जळजळ जाणवत होती, परंतु कामाच्या व्यापात दिवसभरात त्याकडे दुर्लक्ष झालं, मात्र घरी आल्यानंतर तो त्रास वाढल्याचं लक्षात आलं. त्यात बोटांवरची चामडी उडाल्याचं तसंच बोटांना चरे गेल्याचंही लक्षात आलं. आपण याबाबतचे फोटो शिक्षकांच्या समूहात पोस्ट केले, त्यावेळी अनेकांनी आपले फोटो पोस्ट करून त्यांनाही तसाच त्रास झाल्याचं सांगितलं, अशी माहिती सदर शिक्षिकेने दिली, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत वापरलेल्या शाईतच काहीतरी गडबड असावी, असा संशय घ्यायला जागा निर्माण झाली आहे असं त्या शिक्षिकेचे म्हणणं आहे.
निवडणुकीवेळी शाई लावण्याचं काम हे साधारणत: महिलांकडेच असतं. त्याचं कारण समजून येत नसलं तरी बहुतांशी ठिकाणी तसंच चित्र दिसून येतं शाईत वापरलेल्या रसायनात जर काही दोष असेल तर महिलांच्या नाजूक कातडीवर ते झटकन परिणाम करू शकतात, अशी शक्यता या सूत्रधार शिक्षिकेने व्यक्त केली आहे. याबाबत सर्व शिक्षक मिळून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.
शाई तयार करण्याचं काम कर्नाटक सरकारच्या मालकीची म्हैसूर इंक ही कंपनी करते. अनेक वर्ष हीच कंपनी निवडणूक आयोगाला शाई पुरवण्याचं काम करत आहे. भारताव्यतिरिक्त कित्येक देशातसुद्धा या शाईचा निवडणुकीच्या कामासाठी पुरवठा होतो. भारताबाहेरील कंबोडिया सारख्या ठिकाणी तर मताधिकार बजावताना मतदाराला शाईच्या बाटलीत बुडवावं लागतं , तर काही ठिकाणी ब्रशने शाई लावण्याची पद्धत आहे. आपल्याकडे काडीने बोटावर ही शाई लावली जाते. या काडीची लांबी लहान असल्याने तिचा वापर करताना कितीही काळजी घेतली तरी बोटांना शाई लागतेच, त्यामुळे या शाईशी थेट संपर्क निवडणूक कर्मचाऱ्यांना टाळता येत नाही.
सिल्वर नाइट्रेट आणि पाणी यांच्या संयोगातून ही शाई बनवली जात असल्याचं जाणकार सांगतात. ज्यावेळी शाई बोटांवर लावली जाते, ती कातडीत झिरपते व तिथे डाग तयार होतो. जो पाण्यात विरघळत नाही किंवा अल्कोहोल, नेलपेंट रिमुवर, ब्लिचनेही निघत नाही. लावलेली शाई कातडीवर इतकी घट्ट रूतून बसते की ती नवीन कातडीच्या निर्मितीतच गायब होते व त्याजागी नवीन कातडी तयार होते, या शाईतील सिल्वर नायट्रेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर ती त्रासदायक ठरू शकते, अशी माहिती जाणकारांनी दिली.
स्कीन डाॅक्टरांचं म्हणणं आहे की इतक्या वर्षात कधी निवडणूक शाईमुळे त्रास झाल्याचं समोर आलेलं नाही. काही ठिकाणी जर स्थानिक शाईचा वापर झाला असेल तर शक्यता आहे. निवडणूक कामात भाग घेतलेल्या अनेकांना जर शाईचा त्रास झाला असेल तर ते गंभीर आहे. त्यावर संबंधित व्यक्तिंची आणि शाईची तपासणी करून अभ्यास करावाच लागेल.