उल्हासनगर महानगरपालिका सदस्यांच्या पक्षांतरासंदर्भात एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोटं बोलून दिशाभूल केल्याबद्दल पत्रकार आणि समाजाची माफी मागावी, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीने एकाही महापालिका सदस्यांचं पक्षांतर झालं नसल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उल्हासनगरातील भाजपाच्या ३२ पैकी २१ नगरसेवकांचे पक्षांतर झाले असल्याचा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे ट्वीट केले आहे. मात्र उल्हासनगर भाजपाने पक्षांतराचा इन्कार केलाय.
उल्हासनगर महानगरपालिकेतील भाजपाच्या एकाही सदस्याचे पक्षांतर झालेले नसून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा दावा अत्यंत खोटारडा आहे. आश्चर्य असे की माध्यमांनीही कोणतीही खात्री न करता व हातात यादी नसतानाही महापालिका सदस्यांच्या पक्षांतराची हवेतली वार्ता बातमी म्हणून प्रसारित केली आहे, असं भाजपा शहर प्रवक्ता प्रदीप रामचंदानी यांनी म्हटलं आहे.
जर खरोखरच कुठल्या विद्यमान महापालिका सदस्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असेल तर तसं संबंधित महापालिका सदस्यांनी माध्यमांसमोर येऊन घोषित करावं किंवा तशी घोषणा करणाऱ्या संबंधित मंत्री महोदयांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वाॅटस्एपवर लोकांची दिशाभूल न करता पक्षाच्या लेटरहेडवर अधिकृतरित्या त्यांची यादी जाहीर करावी, असं खुलं आव्हान भारतीय जनता पार्टीने देत असल्याचं रामचंदानी यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं.
उल्हासनगरात यापूर्वी अशा प्रकारचे खोटारडे राजकारण शहराने बघितलेले आहे. यावेळी त्यात मंत्री सहभागी झाल्यामुळे हा एक गंभीर विषय बनला आहे, असं म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेल्या महापालिका सदस्यांची अधिकृत यादी देण्यात असमर्थ ठरल्यास त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्रीमहोदय जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांची तसेच समाजाची फसवणूक केल्याबद्दल जाहिर माफी मागावी, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी असल्याचंही प्रदीप रामचंदानी म्हणालेत.
दरम्यान, राष्ट्रवादीने पक्षांतराचा दावा केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मंगल वाघे, प्रमोद टाले तसंच साई पार्टीच्या गजानन शेळके या महापालिका सदस्यांनी व रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी विडिओ जारी करून पक्षांतराचा इन्कार केलाय. मंत्रीमहोदय येतायंत तर आपण आपल्या काही मागण्या असतील तर त्यांच्याकडे मांडू शकता असा निरोप व सोबत सहभोजनाचं निमंत्रण देऊन पप्पू कालानी यांनी राष्ट्रवादीची तसंच नगरसेवकांचीही दिशाभूल केल्याचा आरोप भगवान भालेराव यांनी केला आहे.