मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
पावस परिसरातला बिबट्या गेल्या वर्षभरापासून माणसांवर डूख धरून आहे. विशेष म्हणजे एखाददोन अपवाद वगळता त्याने मोटारसायकल स्वारांवरच हल्ले चढवले आहेत. थोड्या वेळापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडलीय. मेर्वी येथील बेहेरे स्टॉप जवळ मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याने हल्ला केलाय.
मेर्वीला गॅरेजच्या कामासाठी ते गेले होते. घरी परतताना बेहेरेजवळ पुलाच्या चढणीजवळच डाव्या बाजूने जंगलातून अचानक आलेल्या बिबट्याने मागच्या सीटवर बसलेल्या युवकावर पंजाचा फटका मारला. त्याच्या मांडीला जखम झालीय. परंतु, विचलित न होता पुढच्याने वेग वाढवून मोटारसायकल पळवल्याने दोघे वाचले. पावस रूग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.
आधी कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, आता रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात पूर्णगड पंचक्रोशीत बिबट्यांची दहशत आहे. पंचक्रोशीतील पूर्णगड, मेर्वी, शिवार आंबेरे, कुर्धे या गावांत बिबटे मुक्त संचार करताना दिसून आल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन आहेत.
मिडिया भारत न्यूज ची याच संदर्भातील गेल्या वर्षीची बातमी वाचण्यासाठी टिचकी मारा :
मोटारसायकल स्वारांवर का डूख धरून आहे पावसचा बिबट्या ?/
गेल्या तीन महिन्यांत बिबट्यांनी किमान दहा ते पंधरा दुचाकी स्वारांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. अलिकडेच जनार्दन चांदुरकर या शेतकऱ्यावर बिबट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय.
वनखात्याने सापळे रचले, पण बिबटे तावडीत सापडलेले नाहीत. मुंबई, पुणे येथून बिबट्याला पकडण्यासाठी आलेलं पथक तब्बल आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर माघारी फिरलं.
दिवस रात्र गस्त घालूनही वन विभागाच्या पथकाला बिबट्या दिसला सुद्धा नाही. पथक माघारी फिरताच बिबट्याच्या हल्ल्याची ताजी घटना घडली आहे. पूर्णगड हा सगळा जंगलाचा भाग असून बिबट्याच्या दहशतीने लोक भयभीत आहेत.