चुकून चूक झाली तर खूप पच्छाताप होतो. पण कधी कधी त्याचं प्रायश्चित कसं घ्यावं? हेच कळत नाही. नकळत आपल्याकडून कोणीतरी दुखावलं जातं. समोरच्या व्यक्तीला आपण दुखवतोय ह्याची थोडीसुध्दा कल्पना न करता केलेली कृती कधीतरी चुकीची असू शकते. आपण जसा समोरच्याचा विचार करतो. त्याच्या बाबत जे आडाखे बांधतो ते बहुधा चुकीचेही असू शकतात. त्यामुळे एकमेकांची मने दुखावली जाऊ शकतात. नाती कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर जातात. आधी असलेली एकमेकांबद्दलची ओढ कमी होत जाते. त्याच्या बद्दलच बोलणं, ऐकणं नको वाटू लागतं.
प्रेमाने, आनंदाने चालू आहे तोवर ठीक. पण एकदा का एखादी अशी चूक झाली की मग मात्र नात्यात ठिणगी पडलीच म्हणून समजा. आपण समोरच्याला गृहीत धरू लागलो की अशा चुका वारंवार होऊ लागतात. एखाद्याची मनस्थिती जाणून न घेताच केलेली कृती महागात पडते.
शांतपणे, थोडासा वेळ देऊन जर का बोलणं झालं तर त्यात सुधारणेचा वाव असतो. आपणच आपल्या मनाने समोरच्याला काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपली मते त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एखादी चांगली व्यक्ती आपल्याकडून दुखावली जाऊ शकते आणि मग आपल्यावर पच्छाताप करण्याची पाळी येते.
प्रायश्चित कसं घ्यावं म्हणजे त्याच व्यक्ती बरोबर पुन्हा तसेच छान संबंध तयार होतील. ते कळत नाही. अशावेळी आपण सगळ खरं खरं सांगून मोकळं व्हायचं. मनात जराही पण-परंतु ठेवायचा नाही. बोलून हलकं व्हावं. शब्दांच ओझं उगीचच बाळगायचं नाही.
कधी कधी असं होतं की एखाद्या घटनेने ती व्यक्ती इतकी दूर जाते की आपल्याला प्रायश्चित करायलाही अवधी देत नाही. गमावून बसतो आपण अशा चांगल्या लोकांना. प्रायश्चित असं घ्यावं की समोरच्याला ते पटलं पाहिजे. त्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. नाहीतर सल कायम मनात सलत राहते. स्वतःचं मन स्वतःलाच खात राहतं.