आठवड्याभरापूर्वी आग्र्यातील सुशीलनगरमध्ये गोहत्येची घटना घडली. हिंदू महासभेने त्यावर वातावरण तापवलं. संशयित आरोपी म्हणून काही मुस्लिमांची नावं देण्यात आली. पोलिसांनी लागलीच आरोपींची धरपकडही केली. मात्र चौकशीत व तपासात घटनेचा सूत्रधार हिंदू महासभेचा राष्ट्रीय प्रवक्ता संजय जाट निघाला. एत्माद्दौला पोलिसांनी ट्विटरवर या घटनेची पुष्टी केलीय.
मुस्लिमांच्या दोन गटातील वैमनस्यात, एका गटाला फसवण्यासाठी तसंच रामनवमीच्या तोंडावर दंगली भडकावण्यासाठी गोहत्येचा कट रचण्यात आला होता. यासाठी मुस्लिमांच्या एका गटाला हाताशी धरण्यात आलं. त्यांच्याकडून पहाटेच्या सुमारास मैदानात मोकाट फिरणारी एक गाय हेरून कापून घेण्यात आली.
हा गट मांसव्यापारी आहे, ज्यांच्याकडून हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना खंडणी मिळते.
अशाच एका खंडणीप्रकरणात संजय जाटला अलिकडेच अटकसुद्धा झालीय.
सतत ताणतणाव पसरवणे, आंदोलनांच्या धमक्या देणे, वातावरण बिघडवणे यांमुळे पोलिसही संजय जाटला वैतागलेले होते.
गोहत्येची ताजी घटना घडल्यावर आरोपी गटाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांना खबर दिली. मग त्यांनी नेहमीसारखा नंगानाच सुरू केला. गदारोळ माजवला. संशयित म्हणून दुसऱ्या मुस्लिम गटाची नावं घेतली. परंतु, अखेर पोलिस तपासात सत्य बाहेर आलं.
लोकांच्या धार्मिक मूर्खपणाचा गैरफायदा घेत विद्वेषाच्या जीवावर नेता म्हणून मिरवता येतं आणि गोमांस व्यापाऱ्यांकडून खंडणी घेऊन पैसा कमावून आयतं ऐषारामी जीवन उपभोगता येतं. अजून काय पाहिजे ?
एकंदरीत काय दिसतं, तर हिंदुंनी बेअकलीपणे तथाकथित हिंदुत्वरक्षणाचं काम उलट्या काळजाच्या गुंडांकडे सोपवलंय आणि स्वत: घरात बसून काय करतात, तर अशाच गुंडांकडून आलेले प्रक्षोभक संदेश पसरवून स्वत:चा देश पेटवण्याचं काम घरबसल्या करतात.
यालाच ते देशभक्ती म्हणतात.