मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आपण सारेच कोरोनाच्या भयावह संकटात जीव मुठीत घेऊन जगतोय. पण काहीजण नाईलाजाने पोटासाठी मरणालाही कवटाळायला तयार आहेत. उल्हासनगर – अंबरनाथ मधील वेशीवर १५० पारधी कुटुंब रोज मरणाला हुलकावणी देत जगण्याचा प्रयत्न करतायेत. परंतु, आता चौदा महिने झालेत. लाँकडाऊनशी झुंजता झुंजता या पारध्यांचे प्राण कंठाशी आले आहेत.
शिवमंदिराच्या सभोवताली फासेपारधी, शिकारीपारधी, माला पारधी यांची साधारण १५० कुटुंब राहतात. त्यापैकी काही जण उल्हासनगर अंबरनाथमधील बाजारपेठांमध्ये कंगवे, करगोटे, आरसे विकतात, काहीजण तोरणं, रुमाल विकतात ; मिळेल ते काम करतात. काही कुटुंबं रस्त्यावर बसून शंख, माला,अंगठ्या, कवड्या, रंगीत खडे विकून पोटाची खळगी भरतायेत.
यापैकी काही कुटुंबं दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून शिवमंदिराच्या महाशिवरात्रीला हा हंगामी व्यवसाय करण्यासाठी इथे येतात. आणि महिनाभराचा हंगाम कमवून परत जातात.
पण यावर्षी लाँकडाऊनने कंबरडे मोडल्याने ना प्रवास करता येतो , ना धंदा करता येतो. परत गावी जाऊन उपाशी मरण्यापेक्षा गेली चौदा महिने हे मालापारधी रस्त्यावरच अंग चोरून आपले बिऱ्हाड मांडून आहेत. यापैकी बरीचशी कुटुंबं चालत चालत धंदा करत त्र्यंबकेश्वरला परतलेत.
आता केवळ १५ परिवार रस्त्यावर किडुकमुडूक विकून कोरोनापासुन स्वतःला वाचवत पोट भरतायेत. पोलीस बसू देत नाहीत, दिवसाला हजार दीड हजाराचा होणारा धंदा मुश्किलीने शे-दीडशेवर आलाय.
आता तर घरभाडं द्यायची ऐपत नाही म्हणून रात्री फूटपाथवरच लेकरं-बाळं घेऊन झोपतोय. संस्था, समाजसेवकांनी जेवणाची पाकिटं दिली तर पोटभर खातो. नाहीतर वडापाववर गुजराण करतो कुटुंबाची . आता नाही सहन होत. ही प्रातिनिधिक व्यथा आहे, राकेश लालजी भोसले या मालापारधीची !
तो म्हणतो, सरकार रिक्षावाले, तृतीयपंथीयांना १५०० रुपयांची मदत करतेय, मग आम्हाला का नाही ? आम्हाला कायमच समाज आणि सरकारने भटके उपेक्षितच ठेवलंय. पण माणूस म्हणून तरी सरकार मायबापने या कोरोनात आमची चिलीपिली जगवायला हवीत.