मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
माझा जन्म लातूर जिल्ह्यामध्ये झाला. वडिलांचे नाव डॉक्टर सुभाष सूर्यवंशी. लहानपणीच वडिलांचे समाजकार्य जवळून पाहिले; तेव्हापासून आवड निर्माण झाली. लहानपणापासून काहीतरी करण्याची आवड होती.
शिक्षण झाल्यानंतर शिवाजीराव कोथळकर यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर आठ-दहा वर्ष घर संसारात गेली. माझ्या मनात समाजकार्याची खूप इच्छा होती. पण कमी वयातच लग्न झाल्यामुळे माझे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यास माझ्या पतीने मला पूर्ण साथ दिली.
वीस वर्षांपूर्वी घरातील वातावरण पोषक नव्हते की घरातील महिलेने चूल आणि मूल या पलीकडे जाऊन घराबाहेर पडावे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करावे. पण हळूहळू घरच्या लोकांशी बोलून त्यांचे मत परिवर्तन केले. आज त्यांना या गोष्टीचा अभिमान वाटतो.
काहीतरी करण्याची जिद्द मनात होती ; त्यासाठी माझ्या पतीने मला जोतिबा सारखी साथ दिली.
सामाजिक कामाची आवड असल्यामुळे सामाजिक संघटनेशी जोडले गेले. सदस्य पदापासून ते प्रदेश पदापर्यंत पोहचले. सामाजिक संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले. शासकीय महिला बालकल्याण समिती सदस्य, जिल्हा परिषद अंतर्गत शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे असे अनेक उपक्रम तन-मन-धनाने निस्वार्थपणे केले. सर्व पदाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. घरातून पतीची खंबीर साथ असल्याने हे सर्व शक्य झाले.
३ तारखेला मी माझ्या घरापासून सावित्री उत्सवाची सुरुवात करणार आहे. दारात रांगोळी, आकाश कंदील, दरवाज्याला फुलांचे तोरण, घरात गोडधोड आणि उंबऱ्यावर विवेकाची पणती लावणार आहे.
शेवटी येवढेच म्हणावेसे वाटते..
जोती क्रांतीबा जनाचा,
तशी क्रांती जोती साऊ!
त्यांनी लावियले रोप,
आपण नभाला भिडवु…!