मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
विवाहितेसाठी सासू सासरे आईवडिलांच्या जागी असावेत, अशी अपेक्षा असते. तेच तिचे पालक असतात. पण बीडमधील विवाहितेचा अनुभव धक्कादायक आहे.
आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. असल्या बुरसट मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील ? याचा नेम नाही. असाच काहीसा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. पोटच्या मुलाला मूल होणार नाही, याची खात्री झाल्यानंतर, “वंशाला तर दिवा पाहिजे” या पारंपरिक अपेक्षेत एका दाम्पत्याने नात्यातल्या मुलाकडून आपल्या सुनेवरच बलात्कार घडवून आणला. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ही घटना आहे.
पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह 15 वर्षांपूर्वी, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी झाला. 2016 मध्ये तिच्या पतीसह सासू-सासर्यांनी,तिला अंधारात ठेवून अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली.
मात्र त्यानंतर 2020 मध्ये सासूने पिडीतेला सांगितले, की ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही”. आधी तिला यावर विश्वास बसला नाही. त्यामुळं तिने पतीला विचारून याची शहानिशा केली.
3 जानेवारी 2021 रोजी पीडितेच्या सासू-सासर्यांनी सासूच्या भावाच्या मुलाला पीडितेकडे पाठवलं आणि स्वतः दाराबाहेर थांबले. त्यानंतर अनेक वेळा संबंधित आरोपीने सासू-सासऱ्यांच्या पाठबळावर अनेक वेळा घरी येऊन पीडितेवर बलात्कार केला..
यावेळी सासू स्वत: घराबाहेर थांबत असे. “वर हे करण्यासाठी सासू आरोपी देव यादवला खर्चपाण्यासाठी पैसेही देत असे”. असा पीडितेचा आरोप आहे.
पीडितेन म्हटलं आहे की, पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली, की “तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे”. म्हणून मी जे सांगते ते ऐक व तसंच कर. “माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे”. त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्यांनी मला खूप मारहाण केली. त्यानंतरही मी नकार दिला मात्र सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून, नाईलाजास्तव मला होकार द्यावा लागला.
हेही वाचा : पोलिसांच्या असंवेदनशीलतेने घेतला अपहृत मुलीच्या पित्याचा बळी !
त्यानंतर काही दिवसांनी पीडिता गरोदर राहिल्याचे कळल्यावर सासू-सासर्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले आणि चक्क पेढे देखील वाटले.. अनेकांना दारू पाजली. मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं. असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. कारण दरम्यान, पीडितेच्या नवऱ्याला सर्व कळलं आणि त्यांनी तिच्या भावाला बोलवून माहेरी पाठवलं. असं पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे.
पिडीतेचा पती आता तिला नांदवत नाहीये. पीडिता पाच महिन्यांची गरोदर आहे. पुढे जगावं कसं हा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झालाय. एवढंच नाही तर आता आमच्या समाजातील लोक देखील उलटसुलट बोलत आहेत. जातीतून बाहेर काढायचं नाव घेत आहेत. त्यामुळे माझ्या माहेरी देखील मी कशी राहू. असा सवाल पीडितेने केला आहे.
या विषयी पीडितेचा भाऊ म्हणाला, की 2 तारखेला आम्ही तक्रार केली आहे. आज 10 तारीख उलटलीय तरी एकही आरोपी पोलिसांनी अटक केलेलं नाही. आज समाज आम्हालाच नाव ठेवतोय. तिचा नवरा तिला घरात घ्यायला तयार नाही. ज्याने हे केलंय तो मुलगादेखील तिला घरात घ्यायला तयार नाही.
हेही वाचा : महिलेवरील बळजबरीला विरोध करणाऱ्या कुटुंबावर चढवला आरोपींनी हल्ला
समाजातील लोक तर चक्क म्हणतात की मिटवण्यासाठी पैसे घ्या ! …पण पैसे घेऊन आम्ही काय करावं ? आज या पाच महिन्याच्या गर्भाला नाव कुणाचं द्यावं ? त्यामुळे समाज आणि सरकारने आम्हाला न्याय द्यावा ? अशी मागणी पिडीतेच्या भावाने केली आहे.
आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, पण अजून कोणावरही कारवाई झालेली नाही ! तपासी अधिकारी पिंक मोबाईल पथकाच्या प्रमुख, पीएसआय राणी सानप म्हणाल्या की आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना आम्ही अटक करू. मात्र सध्या चुंबळी येथील मुलीच्या आत्महत्या प्रकारणात लक्ष देण्याचं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं थोडा वेळ लागत आहे.
बीड जिल्हा प्रतिनिधी
mediabharatnews@gmail.com