आधी चांगली कविता लिहिता आली पाहिजे, तर तुम्ही चांगले गजलकार होऊ शकता, असा नवकवींना सल्ला देत, अशोक गुप्ते काव्यलेखनाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर गजलकडे वळले, या शब्दांत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी गुप्तेंचं कौतुक केलं.
अशोक गुप्तेंच्या 'हे झाड चेतनेचे' या गजलसंग्रहाचं प्रकाशन बागवेंच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी २५ मे रोजी ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयात संपन्न झालं. यावेळी मंचावर साहेबराव ठाणगे, सतीश सोळांकूरकर, दुर्गेश सोनार अशी मराठी कवितेतली दिग्गज मंडळी उपस्थित होती.
संवेदना प्रकाशनने हा गजलसंग्रह प्रकाशित केला असून, नितीन हिरवेंच्या मनोगताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अशोक गुप्ते यांनी कवी बी अर्थात मुरलीधर गुप्तेंचा वारसा सांगत कविता आपल्या डीएनएतच असल्याचं आवर्जून नमूद केलं. कविता, गजललेखनासंदर्भात उहापोह करताना दुर्गेश सोनार, सतीश सोळांकूरकर आणि साहेबराव ठाणगेंनी मनोगतांदरम्यान काही कविता, गजल सादर केल्या. त्यामुळे ते एकप्रकारे मान्यवरांचं कविसंमेलनच ठरलं.
कविश्रेष्ठ सुरेश भटांनंतर तितकी ताकदीची गजल मराठीत नंतर आली नाही, असं मत अशोक बागवेंनी व्यक्त केलं. गजलेतला प्रत्येक शेर ताकदीचा असला, एकेका शेरासोबत गजल चढत गेली आणि समारोपाला एका उंचीवर गेली तर सरस गजल, असं मांडत बागवे म्हणाले की, ही किमया सुरेश भटांच्या गजलेत आहे.
या कार्यक्रमाला मंचावर तर दिग्गज होतेच, पण सभागृहातही कला, साहित्य क्षेत्रातले सतीश भावसार, केशव कासार, नारायण लाळे, अनंत देशमुख, राजीव जोशी, संदेश ढगे, महेंद्र कोंडे, कॅप्टन दळवी, राज असरोंडकर, बापू राऊत, जितेंद्र लाड, रामदास खरे, छाया कोरेगावकर, वृषाली विनायक, संध्या लगड, कविता मोरवणकर, अशोक जाधव, वैभव वऱ्हाडी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

अशोक गुप्ते झिम्माड काव्यसमुहाचे सदस्य असल्याने झिम्माड परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला चार चांद लावले, सुधीर चित्ते यांच्या सूत्रसंचालनाने. तब्बल तीन तास रसिक मंडळी कार्यक्रमात रंगून गेली होती.