एक मोठी दिलासादायक बातमी युक्रेनमधून येते आहे. खारकीव किंवा कीवमध्ये फसलेल्या भारतीयांना रशियाच्या बाजूनेच बाहेर काढण्यासाठी भारताने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांचे मदतीसाठी येणारे व्हिडीओज, त्यातून भारत सरकार वर होणारी टीका, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, आणि भारतातही लोकांमध्ये निर्माण होत असलेला मोठा असंतोष यामुळे उशिरा का होईना पण भारत सरकार खडबडून जागं झालेलं दिसत आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या तटस्थतेमुळे युक्रेनियन नागरिकांचा भारतीयांसोबत होत असलेला असहकार हेसुद्धा भारताला तातडीचा निर्णय घेण्यास भाग पाडणारं महत्त्वाचं कारण आहे.
दरम्यान, युक्रेनियन अधिकाऱ्यांनी खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाला जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप भारतातील रशियन दुतावासाने केलाय. या विद्यार्थ्यांना युक्रेनियन प्रदेश सोडून बेल्गोरोडला जायचं होतं.
युक्रेनच्या विदेश मंत्रालयाने आपण विदेशी विद्यार्थ्यांना (ज्यात भारत, पाकिस्तान आणि चीनचे विद्यार्थी आहेत,) सुरक्षित जागी हालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केलाय व भारत, पाकिस्तान आणि चीन सरकारला आवाहन केलंय की या देशांनी काही काळ युद्धबंधीसाठी माॅस्कोला आवाहन करावं.
रशियन सशस्त्र सेना भारतीय नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास तयार आहेत आणि त्यांना भारताच्या प्रस्तावानुसार, रशियन प्रदेशातून स्वतःच्या लष्करी वाहतूक विमानांनी किंवा भारतीय विमानांनी घरी पाठवायला सज्ज आहेत, असंही रशियन दुतावासाने ट्वीट करून म्हटलंय.
खारकीव येथील रेल्वे स्थानकांवर भारतीय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असली तरी विद्यार्थ्यांना चढू दिलं जातं नसल्याची माहिती मिळतेय. खूप विनवण्या केल्यावर मुलींना ट्रेनमध्ये शिरू दिलं जातंय. खारकीवमधून युक्रेनच्या पूर्वेकडील सीमांकडे येण्याचा प्रवास खडतर असून थंडी, मुलांची झालेली दगदग, खाण्यापिण्याची आबाळ यांमुळे तो जोखमीचाही आहे.
आज दिवसभरात मुलांचे खूप हाल झालेत. १० ते १२ किलोमीटर चालून गेल्यानंतर आणि चार तासांच्या प्रतिक्षेनंतरही मुलांना ट्रेनमधे बसू दिले गेले नाही.
दुपारी चार वाजेनंतर कर्फ्यु लागला आणि भारतीय दुतावासाने खारकिव सोडण्याचे आदेश दिले .. पुन्हा ही मुलं कुठलंही वाहन न मिळाल्याने बाहेर अवतीभवती बाॅम्बिंग सुरू असताना कशीबशी १२ किलोमीटरवरील एका शेल्टर होममध्ये पोहचली. ही मुलं दोन दिवसांपासून उपाशी होती आणि गेल्या ४८ तासांत जेमतेम एक तास झोपू शकली होती.