जागतिक हवामान बदलावर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवरील सक्षम जलसाक्षर समाज निर्माण हे ध्येय असलेले सहज जलबोध अभियान समाजाला जलक्षेत्रात क्रांतिकारक बदलाचा विचार देणारे ठरते आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहज जलबोध अभियानाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आलीय.
या घोषणेतून पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आणि केंद्रीय भूजल विभागात कार्यरत ज्येष्ठ भूजलवैज्ञानिक आणि सहज जलबोधकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास परिचित उपेंद्रदादा धोंडे यांच्या जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत समाजात जनजागृतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनी नवीन पुढचा टप्पा गाठला आहे.

अवघाचि महाराष्ट्र जलसाक्षर करील हे ब्रीद वाक्य घेऊन २०१९ पासून अधिकृतपणे सहज जलबोध अभियान सुरू केल्यापासून आज तीन वर्षे पुर्ण झाली. सुरूवातीला फक्त वैयक्तिक पातळीवर लिखाण व्याख्यानानं झालेली सुरुवात आता सहज जलबोध अभियान अंतर्गत जलसाक्षरता प्रसारासाठी आठ पुस्तके, ५१ पुस्तिका, हजारो लेख असे प्रचंड वाचन साहित्य आणि २२ निसर्ग बेट, १०० जल आराखडे, शेकडो भूजल पूनर्भरण प्रकल्प आणि १२ तलाव पुनरुज्जीवन अशा अनेक प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांपर्यंत पोचलेली आहे.
सहज जलबोध अभियानाशी जोडले जाण्यासाठी १० दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अवघड अट असून देखील अभियानात जोडले जाणारांची संख्या वाढतच आहे. सहज जलबोध अभियानातून प्रशिक्षित मनुष्यबळ आपापल्या परिसरात जे कृती कार्यक्रम राबवित आहेत ते पाहून आदर्श जलसाक्षरता अभियान कसे असावे याचा प्रत्यवाय येतोय.

जागतिक हवामान बदलांमुळे जनमानसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी गावोगावी प्रशिक्षित निसर्गरक्षक निर्माणाचा हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखिल भारतीय जलचळवळीस नवी दिशा देणारा उपक्रम ठरतोय.
सध्या या कार्यकारिणीत केंद्रीय समन्वयक, राज्य समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक व शेवटी निसर्ग रक्षक अशी रचना आहे.
उपेंद्रदादा धोंडे हे आपल्या भूजलवैज्ञानिक म्हणून प्रदिर्घ अनुभवाचा उपयोग या अभियानात मुख्य मार्गदर्शक म्हणून करत आहेतच परंतु या कार्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्र भरातून कित्येक तरूण भूवैज्ञानिक, कृषी अधिकारी आणि सामाजिक तज्ञ असे भक्कम तांत्रिक मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे.
सहज जलबोध अभियान कोअर टिम मध्ये मयूर बागूल, ऍड. प्रभाकर तावरे-पाटील, प्रशांत शिनगारे, शशांक अहिरे, प्रकाश चोले, शैलेंद्र पटेल, राहूल घोलप, प्रशांत राऊळ, समाधान लभडे, प्रितिश बरे, आराधना ताठे, भिला पाटील, कविता सरवदे, विश्वास सुर्यवंशी, गुरू भांगे, ओंकार कडेकर, एड. आनंद बागवडे, केशव कासार ही नावं आहेत.
ही कार्यकारिणी प्रामुख्याने वर्तमान व भविष्यातील जलसंकटावर खात्रीचा उपाय म्हणून, जागतिक हवामान बदलावर मात करण्यासाठी उपाय म्हणून सहज जलबोध अंतर्गत स्थानिक पातळीवरील जलसाक्षरता मांडणी कशी परिणामकारक ठरू शकते यावर लक्ष केंद्रित करेल.

यासाठी विविध स्तरांवरील श्रोतावर्गासाठी शक्य तितक्या ठिकाणी सहज जलबोध अभियान परिचय मेळावे/ कार्यक्रम घेणे, वर्तमानपत्र, सोशल मीडिया वापर आणि वैयक्तिक पातळीवर भेटीगाठीतून जनसंपर्क ठेवणे, समाजातील जागरुक कार्यकर्ते, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी ईत्यादींपर्यंत सहज जलबोध अंतर्गत सूचवलेल्या कृती कार्यक्रमांची माहिती देणे, जल आराखडा, निसर्ग बेट, भूजल पुनर्भरण, तलाव निर्माण या कृती कार्यक्रमाशी निगडीत फिल्ड व्हिजिट, तांत्रिक मार्गदर्शन आणि सविस्तर डॉक्युमेंटेशन ठेवणे अशा प्रकारे समन्वयक कार्यरत राहतील.
सहज जलबोध अभियान अंतर्गत २० जूलै रोजी सर्व कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान आणि भूजल केंद्रीत पाणलोट आराखडा निर्माण या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती अभियानाचे राज्य समन्वयक मयूर बागुल यांनी यावेळी दिली.