मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी बावचळून गेले, जेव्हा एक बारा वर्षांचा मुलगा आपल्या आईवडिलांविरोधात तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मात्र सहानुभूतीपूर्वक मोठ्या कौशल्याने त्या लहानग्याशी आणि त्याच्या आई-वडिलांनी संवाद साधत प्रकरण हाताळलं.
जामनेरमध्ये भुसावळ रोडला अजय कुमावतचं कुटुंब राहतं. तो अवघा बारा वर्षांचा आहे. सातवीत शिकतोय. अजयला अभ्यासाची गोडी आहे. त्याचं सतत वाचन सुरू असतं. घरी असला की अभ्यासाचं कुठलं ना कुठलं पुस्तक घेऊन वाचत बसायचं, हा त्याचा छंद. पण वडिलांचा टीव्हीचा नाद अजयसाठी मनस्ताप ठरला.
आईवडिल आणि भाऊबहिणींसहित अजय छोट्याशा जागेत राहतो. तिथंच स्वयंपाक, तिथंच टीव्ही, तिथंच अंथरूण, तिथंच टीव्ही अशी दाटीवाटीची परिस्थिती. अभ्यास करताना वडिलांना टीव्ही बंद करायला सांगितला, तर ते ऐकेनात. आईने हस्तक्षेप केला, तेव्हा त्यांच्यात भांडणं झालं व वडिलांनी आईला मारहाण केली. ते पाहून या पठ्ठ्याने सरळ जामनेर पोलिस खातं गाठलं.
सुरूवातीला पोलिसांना कळेना की या छोटू तक्रारदाराचं काय करावं? पोलिस निरीक्षक प्रताप इंगळेंनी मात्र अजयचा चुणचुणीतपणा हेरला. अंगावर धड चांगले कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, अशा अवतारात पोलिस ठाण्यात आलेल्या बाल तक्रारदाराला त्यांनी जवळ घेऊन त्याची विचारपूस केली. अजयच्या अभ्यासाच्या गोडीने इंगळे प्रभावीत झाले.
त्यांनी त्याला बाजारात नेऊन नवीन चप्पल, कपडे घेऊन दिले. आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतलं. समजावलं आणि मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यायला सांगितलं. ” मुलगा नाव काढेल तुमचं, जपा त्याला ” असं पोलिसांनीच सांगितल्यावर अजयलाही हुरूप आला होता.
आपल्या इतक्या वर्षांच्या सेवेत मी पहिल्यांदाच, अभ्यासात व्यत्यय आणणाऱ्या आईवडिलांविरोधात पोलिसात तक्रार करायला आलेल्या लहान शाळकरी मुलाचं प्रकरण हाताळलं, अशी इंगळेंची प्रतिक्रिया होती.