मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.
या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेण्यासाठी फळबागांच्या पुनरुज्जीवनाचं स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निदर्शनास आणली. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल, असंही पवार म्हणालेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी शरद पवारांनी केली. प्रशासकीय यंत्रणा अजून सगळ्याच ठिकाणी पोहचलेली नाही, त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पवारांनी नमूद केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान केळशी, हर्णे, बाणकोट, मांदिवली, वेळास या गावांना भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे तिथे झालेल्या नुकसानाची पवारांनी पाहणी केली तसेच ग्रामस्थांकडून नुकसानाचा आढावाही घेतला. हरिहरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष वामन बोडस यांच्याकडूनही परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय दौरा केल्यानंतर या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली.
या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा, यावर चर्चा झाल्याचं समजतंय.
आपत्तीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त फळबागा, शेती, घरे यांचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झालेय. त्यामुळे पुढील ७-८ वर्षांचा विचार करून ही नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी शरद पवारांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे.
पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटते, असं मत पवारांनी व्यक्त केलंय.
बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे, यावर पवारांनी बैठकीत जोर दिला.
News by MediaBharatNews Team