मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोपर उड्डाण पूल धोकादायक स्थितीत आल्याने बंद झाला, त्याला यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्ष पूर्ण होतील. पण तत्पूर्वीच पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कंबर कसली आहे. काल शेवटचे गर्डर चढवण्यात आल्याचं पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. स्वत: महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी सदरच्या कामाचा मागोवा घेत आहेत, असं महापालिकेचं म्हणणं आहे.
15 सप्टेंबर 2019 पासून कोपर उड्डाण पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिक त्रस्त होते. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हायलाच तब्बल दीड वर्षं गेलं. 22 मार्च 2021 रोजी 15 मिटरचे 7 गर्डर बसविण्यात आले आणि 2 एप्रिल रोजी 12 मिटरचे आणखी 7 गर्डर बसविण्यात आले.
काल 3 मे 2021 रोजी तिस-या व शेवटच्या स्पॅनचे 18 मिटरचे 7 गर्डर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. राजाजी पथवरील स्पॅनचे कामाकरीता ७ मे 2021 पर्यत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
सदर गर्डर्स चढवून झाल्यानंतर क्रॉस गर्डर्स जोडण्यासाठी व स्लॅबचे सेंटरींग लावतांना पादचा-यांचा व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.
पोहोच रस्त्याचे उर्वरित काम व गर्डरवरील स्लॅबचे काम पूर्ण करुन येत्या पावसाळयापूर्वी कोपर ब्रीज वाहतूकीला खुला करणेबाबत नियोजन करण्यात आले आहे, असा कडोंमपा प्रशासनाचा दावा आहे.