मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
ये मेरे सपने यही तो है अपने
मुझसे जुदा न होंगे, इनके ये साये
असं सांगणारे कवी योगेश यांनी आज हिंदी सिनेसृष्टीचा निरोप घेतला. दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ या चित्रपटातली ‘कही दूर जब दिन ढल जाए’आणि ‘जिंदगी कैसी ये पहेली हाये’ ही अत्यंत गाजलेली गाणी योगेश यांनी लिहिली आहेत. सत्तरच्या दशकातील चित्रपटांना उत्तमोत्तम गाण्यांनी या गीतकाराने सजवलं आहे.
योगेश यांचा जन्म १९४३ चा. लहानपणापासून कवितेची/शायरीची आवड होती. मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपट सृष्टीत मनासारखं काम मिळालं नाही. पुढे मात्र सलील चौधरी, ह्रषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. लता मंगेशकर, मुकेश, किशोर कुमार इ. गायकांनी योगेश यांच्या शब्दांवर स्वरसाज चढवला.
योगेशजी शांत आणि मधुर स्वभावाचे होते, अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. २०१८ ला योगेशजींना दीनानाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची आठवण त्यांनी ट्वीटरवर लिहिलीय. “न जाने क्यों, होता है” हे आपलं आवडतं गाणं असल्याचं लता मंगेशकर यांनी आवर्जून म्हटलंय.
‘छोटी सी बात’ चित्रपटातलं ‘रजनीगंधा फुल तुम्हारे’ हे गाणं असो किंवा ‘ये दिन क्या आए लगे फुल हसने’ किंवा मग ‘मिली’ चित्रपटातलं ‘बडी सुनी सुनी है’, ‘मैने कहा फुलोंसे’, अमिताभ-मोसमी चटर्जी या जोडीचं रसिकांनाही पाऊस अनुभवायला लावणारं ‘रिमझिम गिरे सावन’ अशी एकाहून एक सरस गाणी कवी योगेश यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला दिली आहेत. आजही ही गाणी रसिकांच्या मनाला रिझवतात.
योगेशजींचा यथायोग्य सन्मान झाला नाही, यांचं आश्चर्य वाटतं, अशी खंत ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलीय.
वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी कवी योगेश यांनी बाॅलिवुडचा निरोप घेतला. त्यांच्या गाण्यांतून कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील ;
“अचानक ये मन किसीके जाने के बाद
करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात”
News by Vrushali Vinayak