मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
उत्तरप्रदेश पोलिसांनी कुविख्यात गॅंगस्टर विकास दुबे आणि त्याच्या अनेक साथीदारांना गोळीबारात ठार केलेलं असलं आणि त्यावरून गुन्हेगारांच्या राजकीय संबंधांची माहिती दडपली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला असला तरी कानपूर हत्याकांडातील एक वॉन्टेड आरोपी आपल्या साथीदारांसह महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आता उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी संबंध असलेल्या राजकारणाच्या नाड्या महाराष्ट्र सरकारच्या हातात आल्या आहेत.
महाराष्ट्र एटीएस मधील बहुचर्चित पोलीस अधिकारी दया नायक यांनी ठाण्यातील कोलशेत रोड भागातून अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन आणि सुशिल कुमार तिवारी उर्फ सोनू या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही कानपूरमधील पोलीस हत्याकांडातील फरार आरोपी आहेत. अरविंद त्रिवेदी हा विकास दुबेचा खास माणूस असून तो त्याच्या सोबत अनेक गुन्ह्यात सहभागी आहे. सोनू हा त्याचा ड्रायव्हर आहे.
उत्तरप्रदेशातून पळ काढल्यानंतर महाराष्ट्रात आसरा शोधण्याच्या प्रयत्नात हे दोघे होते. ही बातमी खबऱ्यांमार्फत एटीएसला कळाली आणि पोलिसांनी आपला सापळा रचला. लपायला जागा शोधण्याच्या नादात पोलिसांच्या सापळ्यात हे दोघे आरोपी स्वतःहून चालत आले.
उत्तर प्रदेश सरकारमधील उच्चपदस्थांची विवेक दुबेशी हितसंबंध होते. त्याच्या गुन्हेगारीला राजकीय पाठबळ होतं. ते उघड होऊ नये, यासाठीच त्याचा बनावट चकमकीत खातमा करण्यात आला, असा आरोप उत्तर प्रदेशातील काँग्रेससह सपा आणि बसपा या राजकीय पक्षांनीही केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशवर असलेलं भारतीय जनता पार्टी आणि योगी आदित्यनाथ यांचं राजकीय वर्चस्व आणि केंद्रातील सरकारचं एकतर्फी भक्कम पाठबळ यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी होण्याची शक्यता नव्हती;
परंतु त्या प्रकरणातील आरोपी आता महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आता तपासाच्या निमित्ताने सगळा राजकीय डाव गैरभाजपा राज्यातल्या महाराष्ट्र सरकारच्या हातात आला आहे.
News by MediaBharatNews Team