शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत यांच्या पत्रानुसार, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी व महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका घडवून आणण्यासाठी एका मोठ्या नेत्यांने त्यांना 'ऑफर' दिली होती व तसं न केल्यास दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशाराही दिला होता.
एका माजी रेल्वेमंत्र्यांना ज्याप्रमाणे तुरुंगात सडावं लागलं, तशी पाळी तुमच्यावर येऊ शकते, अशी धमकीही दिली होती, परंतु त्याला न जुमानल्यामुळे ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.
आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ज्या मालमत्तांचा उल्लेख केलेला आहे आणि ज्या मालमत्तांचे व्यवहार दहा वीस वर्षांपूर्वी झालेले आहेत, अशा मालमत्तांच्या मूळ मालकांना गाठून त्यांना धमकावून आपल्याविरोधात जबाब घेण्याचे प्रयत्न तिकडून सुरू आहेत, असाही संजय राऊत यांचा आरोप आहे.
अलिकडेच संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न झालं. त्या लग्नासाठी कंत्राट घेतलेल्या डेकोरेटर्सनाही पन्नास लाख रुपये रोख मिळाल्याचे जबाब धमकावून नोंदवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे.
केवळ खासदारच नव्हे तर त्यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबीयांनाही केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे.