मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
अंबरनाथमधील मोहनपुरम निवासी संकुलाचे यंदा प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केलाय. मोहनपुरम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाडकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. आपल्या सहकाऱ्यांसोबत नाडकर यांनी समाजमाध्यमातूनही जनजागृती करत हा विषय व्यापक व्हावा, यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
दिवाळीतील फटाक्यांमुळे हवा मोठ्या प्रमाणात प्रदुषित होते. दिवाळी हा भारतातला मोठा सण असल्याने त्याचा परिणाम देशात सर्वत्र होतो. फटाके जाळण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. फटाक्यांंच्या धूरात बेरियम नायट्रेट ,लिथियम, पोटॕशिअम ,अॕल्यूमिनिअम यासारखे विषारी वायू असतात आणि त्यांचा परिणाम मुख्यत्वे माणसाच्या श्वसनाच्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतात, त्यामुळे लोकांना गंभीर विकारांना सामोरे जावं लागतं. भारतात जवळजवळ ८० लाखांहून अधिक लोक कोरोना बाधित झाले. त्यातले सव्वा लाख मृत झालेत त्याला ऑक्सिजन पातळी आणि श्वसनाचा त्रास हे दोन घटक मुख्यत: कारणीभूत आहेत
हीच बाब लक्षात घेऊन, फटाकेमुक्त दिवाळीसाठी अंबरनाथ येथील मोहनपुरम या सामाजिक संघटनेमार्फत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फटाकेमुक्तीचा उपक्रम राबविला जात आहे. मोहनपुरम मित्रमंडळाचे संस्थापक राजेश नाडकर आणि त्यांचे ३० सहकारी प्रदुषणमुक्त दिवाळी ही संकल्पना स्थानिक पालक वर्गाला समजावत आहेत, जेणेकरून त्यांनी ती लहान मुलांपर्यंत पोहचवावी. लहान मुलांना समजावणं कठीण असतं, त्यांचंही गेटटुगेदर करण्याचं मंडळाचं नियोजन आहे.
हिंदू सण साजरे होत असतानाच प्रदुषणाचे विषय काढले जातात, या आक्षेपावर राजेश नाडकर म्हणाले की हा उपक्रम धर्माच्या विरोधात नसून ती काळाची गरज आहे. सणउत्सव हे आनंदासाठी आहेत, आनंद हिरावून घेण्यासाठी नाहीत. आज कोविडविरोधातील लढाईत डॉक्टर, पोलिस असे कितीतरी समाजघटक कार्यरत आहेत. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करून आपण त्या लढाईत योगदानच देणार आहोत. देशासाठीच ते योगदान आहे आणि तोच सगळ्यात मोठा आनंद आहे.
विडिओ पाहण्यासाठी टिचकी मारा