पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली ज्वेलरचा लोकांना दहा कोटींचा गंडा
अल्प मुदतीत गुंतवलेले पैसे दामदुपटीने परत मिळण्याच्या आमिषामुळे आजवर हजारोंची फसवणूक झाली आहे ; परंतु लोकांची झटपट पैसे मिळवण्याची हाव सुटताना दिसत नाहीये. शहापुरात एका ज्वेलरने अशा फसवणुकीच्या योजनेतून लोकांना दहा कोटींचा गंडा घातला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे व गेले वर्षभर तो आधारवाडी जेलची हवा खात आहे. २८ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामिनासाठी केलेला अर्जही न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी फेटाळला. ॲड. ऄ ऄ टाकळकर यांनी यावेळी राज्य सरकारच्या वतीने काम पाहिलं.
आपले पैसे बुडू नयेत, म्हणून शेतकऱ्यांनी मनसेकडे मदतीसाठी धाव घेतली होती. मनसे नेता अविनाश जाधव ते प्रकरण हाताळत होते. आरोपीला जामीन मिळू नये म्हणून मनसेकडूनही मुंबई उच्च न्यायालयात वकील देण्यात आला होता. मनसेच्या कल्याण जिल्हा विधी विभागाचे अध्यक्ष ॲड. कल्पेश माने आणि ॲड. सत्येन पिल्ले यांनी मनसेच्या वतीने सुनावणीत भाग घेतला. आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याचा आनंद म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी ॲड. माने आणि पिल्ले यांचा सत्कारही केला.
अनिता सोनवले या महिलेने विशाल ज्वेलर्सच्या जाहिरातीला भुलून दोन लाखांची गुंतवणूक केली होती. त्यानंतरही विशाल ज्वेलर्सचे मालक राहुल राजगे यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांनी आणखी सहा लाख गुंतवले. महिन्याला दीड हजार व्याज मिळेल असं त्यांना सांगण्यात आलं होतं, परंतु प्रत्यक्षात तसं घडले नाही. राहुल राजगेचा फोनही बंद झाला आणि मागोमाग तोही गायब झाला.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर अनिता सोनवले यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली. पोलीस तपासात अशाप्रकारे कित्येकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं. जवळजवळ ६३४ गुंतवणूकदार योजनेला बळी पडले होते. या सगळ्यांना मिळून दहा कोटींचा गंडा घालण्यात आला होता.
तक्रारदारांच्या जबाबातून एक गोष्ट स्पष्ट झाली की बाबासाहेब उर्फ विठोबा कचरे हा पूर्वी फसवणुकीचा धंदा करायचा. त्याच्याच शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी गुंतवणूक केली, परंतु नंतर तो मूर्तिकार व मंगळसूत्र ज्वेलर्स च्या नावाने नव्या व्यवसायात शिरला आणि विशाल ज्वेलर्सचा कारभार राहुल राजगेकडे आला. गुन्हा दाखल झाल्यावर तसंच जामीनासाठी अर्ज करताना वैशाली ज्वेलर्सशी आपला संबंध नसल्याचा बचाव केलाय. पण अनेक व्यापारसंबंधित वेबसाईटवर वैशाली ज्वेलर्सचा सीईओ म्हणून कचरेचं नाव आहे.
राहुल राजगेने विठोबा कचरेला २३ लाखांची रक्कम वळती केली असल्याचंही तपासात उघड झालंय. या गुन्ह्यात बाळासाहेब उर्फ विठोबा कचरे याच्या सहभागाचाच तो पुरावा होता. पोलिसांनी कचरे आणि राजगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
कचरे गेल्या वर्षभरापासून आधारवाडी तुरुंगात आहे, तर राजगे अजूनही फरार आहे. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमीनींचा मोबदला म्हणून शहापूरच्या शेतकऱ्यांना एकरकमी मोठी रक्कम मिळाली होती. राजगे-कचरे दुकलीने फसवी योजना आणून त्यावर डल्ला मारला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रणवीर बायेस यांनी या प्रकरणाचा तपास केला.