सिग्नल तोडला तरी दंड नाही; नागपूर पोलिसांची हमी !!!

सिग्नल तोडला तरी दंड नाही; नागपूर पोलिसांची हमी !!!

सिग्नल तोडला तरी दंड नाही; नागपूर पोलिसांची हमी !!!

भारताची चांद्रयान२ मोहिम शेवटच्या क्षणी अगदी थोडक्यात फसली. या मोहिमेचं थेट प्रक्षेपण पाहायला देश जागला होता. पण चांद्रभूमीपासून अवघ्या दोन किलोमीटरवर विक्रम लॅन्डरचा संपर्क तुटला आणि भारतीयांचं मन उदास झालं. अर्थात, नेहमीप्रमाणेच यावेळीसुध्दा देशभावना तात्पुरती ठरली आणि आपापल्या विनोदबुध्दीनुसार अतार्किक मजकुराचा मारा समाजमाध्यमात सुरू झाला. आश्चर्याची बाब अशी की त्यात नागपूर पोलिसही सहभागी झाले आहेत.

९ सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी १३.१५ वाजता नागपूर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवरून पोस्ट करण्यात आलीय की विक्रम तू परत ये. सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही तुला दंड करणार नाही. नागपूर पोलिसांचं हे ट्वीट १५ हजारांहून अधिकांनी रिट्वीट केलंय, तर ५० हजारांहून अधिकांनी ते लाईक केलंय. बहुतांशी नेटकऱ्यांनी नागपूर पोलिसांच्या विनोदबुध्दीला दाद दिलीय.

पोलिसांकडून असं ट्वीट येणं सुखद असल्याचं अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केलंय. हाच मजकूर नागपूर पोलिस कमिशनरेट या फेसबुक खात्यावरूनही पोस्ट झालाय. तिथेही लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी पोलिसांना नागपूरमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची आठवण करून दिलीत, तर काही जणांनी कायदा सुव्यवस्था अशी सांभाळणार का, म्हणूनही विचारलंय.

चांद्रयान२ ही भारताची एक महत्त्वाकांक्षी मोहिम होती. त्याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा इस्रोचा निर्धार होता. सगळ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे होतं. पण प्रधानमंत्री इस्रो प्रमुख के सिवन यांचं सांत्वन करताना त्यांना मारलेली मीठी, मोहिमेच्या वृत्तांकनाला झाकोळून गेली. त्यातून मोहिमेच्या अपयशाची बातमी झाकण्यात सरकारला यश मिळालेलं असलं, तरी मोहिमेमागच्या वैज्ञानिक चर्चेचं गांभीर्यसुध्दा कमी झालं, तर भारतीयांनी समाजमाध्यमात केलेल्या वेळकाढू अतार्किक पोस्टमुळे ही मोहिम टिंगलटवाळीचा विषय झाली. त्यात पोलिस विभागाने भर घालणं योग्य आहे का, हा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.

नागपूर पोलिसांचं ट्वीट म्हणजे थिल्लरपणा असून, इस्रो च्या वैज्ञानिकांनी केलेल्या कष्टाची टिंगलटवाळी आहे. कडक शब्दात निषेध.

आनंद शितोळे सामाजिक कार्यकर्ता

भारतीय समाज प्रचंड श्रध्दाळू आहे. एका बाजूला तो चांद्रयान मोहिमेचं थेट प्रक्षेपण बघतो आणि चंद्राला भक्तीभावे पुजतोसुध्दा. चंद्रावर डाग का आहेत, यांच्या भाकडकथाही आपल्याकडे रूढ आहेत. अमुक दिवशी चंद्राकडे पाहिलं तर चोरीचा आळ येतो, अशी अंधश्रध्दाही आहे. चंद्रग्रहणाबाबतही खूप साऱ्या गैरसमजूती समाजात आहेत. चंद्र ही एक दैवी व्यक्ति म्हणूनच उभी केलेली आहे. गोष्टींमधून, गीतांतून चंद्राला मामा म्हटलेलं आहे. पुजापाठात, रूढीपरंपरात चंद्राचं आपलं एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. चांद्रयानसारख्या वैज्ञानिक मोहिमांतून अज्ञानातून आलेल्या गैरसमजूतींना धक्का बसत असतो.‌अशावेळी हितसंबंधित त्या कायम ठेवण्यासाठी धडपडत असतात. जग आधुनिकतेकडे जात असताना नवं पुढे आलेलं ज्ञान आपण डोळसपणे न स्वीकारता जुन्या भ्रामक समजुतींना कवटाळून बसणार असून तर मग वैज्ञानिक मोहिमांची काही उपयुक्तताच उरत नाही. जे इतकी वर्षं चंद्राच्या बाबतीत झालं त्याचीच पुनरावृत्ती विक्रम लॅन्डरच्या बाबतीत होत आहे. एका यंत्राला मानवी रुपात सादर करण्याचा खटाटोप देशात सुरू आहे, जेणेकरून भविष्यात त्याच्याही भाकडकथा रचता येतील. ज्यांच्या स्मृती जपण्यासाठी हे नाव घेतलं गेलंय, त्या विक्रम साराभाईंचीसुध्दा ती चेष्टा आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकार प्रफुल केदारे यांनी दिलीय.

मुंबई पोलीस काय किंवा नागपूर पोलीस काय मती भ्रष्ट झाल्यासारखे का वागत आहेत ? सरकारने तर खिल्ली उडवली आहेच पण पोलीस प्रशासना सारख्या जबाबदार व्यवस्था देखील शास्त्रज्ञांची खिल्ली उडवणार असतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अर्थात ज्या न्यायालयात रामायणाचा दाखल दिला, जातो, ज्या पोलीस स्थानकात सत्यनारायण आणि गणपती आणले जातात तिथे सद्सदविवेक बुद्धीची वाणवा असणारच.
अमोल गायकवाड सामाजिक कार्यकर्ता

हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. विनोद, थट्टा किंवा टिका कुणी करावी व कोणत्या प्रसंगी करावी याचे भान नागपुर शहराच्या वहातुक शाखेला राहिले नसल्याचे यातून स्पष्ट होते, शिवाय एक प्रकारे देश आणि जगातील वैज्ञानिक ज्या प्रकल्पाकडे अतिशय गंभीरपणे आणि अभ्यासूवृत्तीने पाहात आहेत आणि चंद्रायन2 हे चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी इस्रो च्या नियंत्रण यंत्रणेतून निसटून कसे व कुठे भरकटले याचा शोध घेण्यात रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, देशाचे ९०० कोटी रुपये ज्याप्रकल्पावर लागले आहेत आणि सर्व नागरिक वैज्ञानिकांना धीर आणि शाबासकी देत असताना, राज्य सरकारच्या एका विभागाकडून अश्या प्रकारची थट्टात्मक प्रतिक्रिया येणे, हे केवळ निषेधात्मक नाही तर याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभाग प्रमुखावर कारवाई केली पाहिजे. शिवाय वाहतूक कायदा मोडणे हा थट्टेचा विषय नसून शिस्तीचा भाग आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधित आहे. त्याचे देखील भान ही थट्टा करताना विसरले गेले आहे.

किरण सोनवणे पत्रकार

पोलिस हा समाजात सदासर्वकाळ डोळ्यात तेल घालून वावरणारा समाजघटक आहे.‌ त्याला सजग राहावं लागतं. गुन्हेगारी ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही रुपात अस्तित्वात असते. अंधश्रध्दा जोपासणं ही अप्रत्यक्ष गुन्हेगारी आहे. विनोदबुध्दीआडून तिचं समर्थन होऊ शकत नाही. त्यातही आणखी गंभीर गोष्ट की तू परत ये. सिग्नल तोडल्याबद्दल तुला दंड करणार नाही. तेही केंद्राने मोटर वाहन अधिनियमांत ठळक बदल केल्याच्या पार्श्वभूमीवर. सरकारचे कोणतेही विभाग एकप्रकारे सरकारचंच प्रतिनिधित्व करत असतात. तिथून आलेलं विधान समाज सरकारची अधिकृत भूमिका म्हणून घेत असतो. एखादा विषय देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असतो, तेव्हा त्याचं खोबरं होऊ नये, ही जबाबदारी प्रत्येक विवेकी नागरिकाची आहे. त्यामुळे ती पोलिसांसारख्या जबाबदार समाजघटकाची आहेच. समाज माध्यमांचा अत्यंत बेजबाबदार वापर केला जातो. त्याला योग्य दिशा देण्याऐवजी पोलिसांनीच त्यात सहभागी होणं समर्थनीय होऊ शकत नाही.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!