वाण नाही पण गुण लागला, या उक्तीप्रमाणे आता भाजपाच्या भजनी लागल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थकांनी जिथेतिथे आपल्या तथाकथित हिंदुत्ववादाची झलक दाखवायला सुरुवात केली आहे. विरोध करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा शिंदेगटाचा फंडा आता पत्रकारांपर्यंत येऊन पोचलाय.
आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांच्या तक्रारीवरून पत्रकार संजय राजगुरू यांच्याविरोधात अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला अदखलपात्र गुन्हा हे शिंदे गटाच्या दडपशाहीचं ताजं उदाहरण आहे. संजय राजगुरू उल्हासनगर मराठी पत्रकार संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांना घाबरवून आमदार किणीकर सगळ्या पत्रकारांना दबावाखाली घेऊ पाहत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना धमकावून शिवसेना सोडायला भाग पाडणं, समाजमाध्यमात विरोधात लिहिणाऱ्यांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवून सतावणं, फौजदारी गुन्हे दाखल करणं असे प्रकार शिंदे समर्थकांनी सुरू केलेले आहेत. अलिकडेच कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठाकरी शिवसैनिक आशा रसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातही असेच प्रकार सुरू आहेत. मध्यंतरी उल्हासनगरातही दिलीप मालवणकर यांची सतावणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांनाच हाताशी धरून करण्यात आला होता.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणजे जणूकाही आपण सगळ्या शासकीय यंत्रणांचे मालकच झालो आहोत, अशा अविर्भावात गल्लीबोळातले शिंदेसमर्थक वावरत असून प्रशासनात कमालीचा हस्तक्षेप सुरू झाला आहे.
अंबरनाथमधील वडवली भागात आंबेडकर भवन उभारण्याच्या नावाखाली तिथलं राहुल हाऊसिंग सोसायटीतील मैत्रेय बुद्धविहार पाडलं जाणार असल्याची कुणकूण लागल्याने विहाराशी संबंधित काही महिला कार्यकर्त्या आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना धमक्यांना सामोरं जावं लागलं, अशी त्या महिलांची तक्रार आहे.

मी आता पहिल्यासारखा राहिलेलो नाही, तुम्हाला एकेकाला आधारवाडी जेलला पाठवीन, तुमचा कोंबडा बनवेन, माझ्या नादी लागू नका, असं आमदार किणीकर म्हणाल्याचं संबंधित महिलांची तक्रार आहे.
या प्रकरणाचं वृत्तांकन पत्रकार संजय राजगुरू यांनी केलं होतं. त्यात त्यांनी आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचीही बाजू मांडली होती. तरीही, राजगुरू हे चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ निर्माण करीत असल्याची तक्रार किणीकर यांनी पोलिसांत केली.

त्यावरून, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात संजय राजगुरू यांच्याविरोधात भादंवि कलम ५०१ खाली अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. वृत्तपत्रात प्रसारित केल्या जाणाऱ्या बातमीच्या आधारे समाजात असंतोष व तेढ निर्माण होवून एखादा दखलपात्र गुन्हा होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अशी नोटीसही फौजदारी दंड संहितेतील कलम १४९ अन्वये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी संजय राजगुरू यांना बजावली आहे.
शिंदे-फडणवीसांच्या कार्यकाळात आम्ही पत्रकारिता करायची की नाही आणि करायची तर वर्तमानपत्राला बातमी पाठवण्याआधी ती स्थानिक आमदारांना किंवा पोलिसांना दाखवायची का, असा सवाल पत्रकार संजय राजगुरू यांनी केलाय.
कायद्याने वागा लोकचळवळीने सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला असून, पत्रकार राजगुरू यांना बजावलेली नोटीस मागे घ्यावी म्हणून पोलिसांकडे मागणी केली आहे.