मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूरचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि ग्रंथसखाचे शाम जोशी यांच्या अथक प्रयत्नातून बदलापूर पश्चिमेला सुसज्ज अभ्यासिकेसह दुसरं भव्य ग्रंथालय निर्माण करण्यात आलेलं आहे. मुळात हे ग्रंथालय आहे. त्यामुळे अभ्यासकांसाठी तिथेच बसून संशोधन करण्याची मोठी सोय करण्यात आलेली आहे.
कॅ. दामले हे नगरसेवक आहेत. त्यांनी धूळ खात पडलेली भव्य वास्तू या प्रकल्पाला दिली.
सार्वजनिक वाचनालय कल्याणनेही किमान नाममात्र भाड्यात जागा मिळावी म्हणून अथक प्रयत्न केले. दुर्दैवाने या सर्व जागा आपापल्या लोकांत लाटल्या गेल्यात ; प्रसंगी आरक्षणाचे नियम फाट्यावर मारण्यात आले.
कल्याणात महापालिकेच्या ताब्यातली माजी खासदार प्रकाश परांजपे अभ्यास केंद्राची भव्य जागा आजही धूळ खात पडलेली आहे. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही ती सार्वजनिक वाचनालयाला दिली जात नाही याला प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत.
आज राजकीय क्षेत्रात असणा-या लोकांच्या इच्छाशक्तीच्या अभावी, ग्रंथालयाच्या संचालकांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावी, ग्रंथालयात अभ्यासू ग्रंथपालांच्या अभावी, वाचक, विशेषतः तरूण वाचक वाचनापासून दूर चाललेले आहेत. सार्वजनिक वाचनालयं कालबाह्य होत चाललीय का, असा प्रश्न पडू लागलाय.
अशा सर्व वातावरणात लोकप्रतिनिधी वा राजकीय पक्षाने अशा प्रकारचं काम उभं करणं म्हणूनच कौतुकास्पद आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पांची व ते समजणा-या लोकप्रतिधींनींची समाजाला आवश्यकता आहे.
शाम जोशी ग्रंथसंवर्धक आहेत. शारिरीक मर्यादा, वय व आजारपणाला न जुमानता हे काम उभं करणं हे अभिनंदनीय आहे. त्यांना साथ देणा-या अर्चना कर्णिक यांना पुस्तकं फुलं, फुलपाखरं वाटतात, सरकारने टेकओव्हर केलेल्या ग्रंथसखात त्यांना घेतलं गेलं नाही. पण त्या नाऊमेद झाल्या नाहीत. शामरावांच्या प्रयत्नात बरोबरीने उभ्या राहिल्या.
या कामासाठी सर्वार्थाने सहकार्य करणा-या कॅ. दामलेंना सलाम…!!!
कवी तथा अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, कल्याण