मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये शुभम मणी त्रिपाठी या पत्रकाराची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुभम मणी हा केवळ पत्रकार नव्हता तर तो भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याचे मोठे बंधू भाजपात प्रदेश प्रवक्ते आहेत. शुभम वर ज्यांनी गोळ्या झाडल्या, ते आरोपी मुस्लिम आहेत. परंतु ही घटना कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेने हिंदू-मुस्लीम रंग देऊन पुढे आणली नाही. वाढवली नाही. इतकंच नव्हे तर त्या घटनेवर सोयीस्कर मौन बाळगलं. याचं कारण शूटर जरी मुस्लिम असले तरी सुपारी देणारी व्यक्ती विश्व हिंदू परिषदेची पदाधिकारी आहे.
मानवाधिकार आयोगानेही सदर प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
लोकशाहीत मिडिया चौथा खांब मानला जातो,पत्रकारितेचं असामाजिक तत्वांपासून रक्षण देणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. राज्य सरकारने ह्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
शुभम मणी त्रिपाठी कानपूरमधून प्रकाशित होणाऱ्या हिंदी दैनिक कंपू मेलसाठी पत्रकार म्हणून काम करत होता. राजकीयदृष्ट्या तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. फेसबुकवर भूमाफीयाविरुद्ध लिखाण केल्यामुळे त्याच्यावर गेल्यावर्षीही जून महिन्यामध्येच हल्ला झाला होता. लेडी डाॅन म्हणून उन्नावच्या गंगाघाट भागात दहशत असलेल्या दिव्या अवस्थी यांनी शुभमच्या दुकानात घुसून तोडफोड केली होती. गोळीबारही केला होता.
पण दिव्या अवस्थी विश्व हिंदू परिषदेच्या उन्नावच्या मातृशक्ती विभागाच्या संयोजिका ! राष्ट्रीय ब्राह्मण एकताच्या प्रदेशाध्यक्ष ! त्यांच्या फेसबुक प्रोफाईल नुसार, त्यांनी स्वत:चा उल्लेख भाजपा युवा नेता असाही केलाय.
बहुतेक, यांचं कारणांमुळे पोलिसांना अवस्थी आणि त्यांच्या टोळीविरोधात ठोस कारवाई करता आलेली नाही. पण उत्तर प्रदेश सरकारच्या या धर्मानुनयामुळे शुभम मणी त्रिपाठी सारख्या युवकाला जीव गमावावा लागला.
दिव्या अवस्थी, त्यांचे पती कन्हैय्या अवस्थी, दीर राघवेंद्र अवस्थी व इतर गुंडांच्या वाळू माफियागिरी व भूमाफियागिरीविरोधात शुभम मणी त्रिपाठीच्या तक्रारी होत्या. या मंडळींची हिंदुत्त्वाच्या आड चाललेली गुंडगिरी शुभमला मान्य नव्हती. त्याच्या तक्रारीवरून अवस्थी टोळीने जमीन हडपून केलेलं एक अनधिकृत बांधकाम स्थानिक नगरपालिकेने निष्कासित केलं होतं. त्यावरून शुभमला धमक्या येत होत्या. शुभमने तसं पोलिसांना कळवलं होतं. फेसबुकवर त्याने आपल्याविरोधात सुपारी दिली जात असल्याचे संकेतही दिले होते. घटनेच्या ५ दिवस आधी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येच हत्येचे धागेदोरे असल्याचं स्थानिक पत्रकार संघटनेनेही म्हटलं आहे.
चर्चित भूखंडाचे मी काही दिवसाअगोदरच कव्हरेज केले होते. त्यावरुन शासनाने भूमाफीयाविरुद्ध कार्यवाही केलेली आहे. क्रोधीत भूमाफीयाने माझ्याविरुद्ध पोलिसाकडे तक्रार केलेली आहे.
त्रिपाठी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दिव्या अवस्थेची गंगा घाट परिसरात दहशत आहे. आपल्या सासऱ्यांच्या हत्येनंतर दिव्या राजकारणात आली तिने स्थानिक नाव नगरपालिकेची निवडणूकही लढवली आहे आपण व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात आल्याची बोलबच्चनगिरी ती लोकांमध्ये करत असे साधारणता सर्वसामान्य लोकांना आवडणारी मदत कार्य ती करत असे.
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दिव्या अवस्थी हिंदुत्वाचे राजकारण करत असली तरीसुद्धा तिने आपल्या टोळीमध्ये लोकांवर दहशत ठेवण्यासाठी मुस्लिम गुंड बाळगले होते. त्यांच्या मार्फतच तिने शुभम मणी त्रिपाठीची चार लाखांची सुपारी दिली. ज्या आरोपी पकडले गेलेत, त्यात शहानवाज अफसर अहमद आणि अब्दुल बारी चा समावेश आहे. दिव्य अवस्थीचा खास माणूस मोनू खान फरार आहे.
फरार आरोपीत पती कन्हैया अवस्थी, देवर राघवेंद्र अवस्थी, यशू, मोनू खान, कौशल किशोर, स्वरूप चंद्र शर्मा, कपिल कठारिया, अतुल दुबे और विकास दीक्षित यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिव्या अवस्थीवर दहा हजारांचं तर मोनू खान व इतरांवर पाच हजारांचं इनाम लावलं आहे.
विद्वेषी राजकारणात हिंदुमुस्लिम वादाचा नेहमी वापर केला जातो. एखादं जरी नाव मुस्लिम सापडलं तरी संपूर्ण समाजाविरोधात गरळ ऐकायची संधी हिंदुत्ववादी सोडत नाहीत. अगदी केरळमधील हत्तीणीच्या, पालघरमधील साधूंच्या अपघाती मृत्यूलाही हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न झाला.
पण शुभम मणी त्रिपाठीच्या हत्येत पकडलेले आरोपी मुस्लिम असूनही हिंदुत्ववादी गप्पगार आहेत. पीडीत ब्राह्मण असूनही देशभरातले ब्राह्मण गप्प आहेत. कारण मुख्य आरोपी हिंदू आहे, ब्राह्मण आहे. हिंदुत्त्वाच्या नावावर हिंदुत्ववादी आयटी सेलच्या नादी लागून सातत्याने विद्वेषी लिखाण काॅपी, पेस्ट, शेअर्ड, फाॅरवर्ड करणाऱ्यांनी खरंतर अशा घटनांतून धडा घेण्याची गरज आहे.