मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून अवघ्या ३८ किलोमीटरवरील सिहोर शहरातील मालवीय समाजमंदिरात एक विवाहसोहळा संपन्न झाला. ना बॅन्डबाजा, ना वरात, ना कोणी मंत्रतंत्र म्हणायला पंडित ना फेरे, ना मंगळसूत्र, ना भांगेत कुंकू असं हे दिसायला साधंसुधं पण सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारक लग्न होतं. मंत्रगाथांऐवजी संविधानाची उद्देश्यिका उच्चारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबीरीच्या साक्षीने वधुवरांनी एकमेकांस पतीपत्नी म्हणून स्वीकारलं.
कोविड संकटकाळात सगळ्यांवरच आर्थिक तंगीची कुऱ्हाड कोसळल्यावर सिहोरमधील सामाजिक कार्यकर्ते राजेश मालवीय यांनी कसलाही बडेजाव न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे घडवून आणण्यात पुढाकार घेतलाय.
मालवीय समाज युवा संघटनेकडून याबाबत समाजात जनजागृती सुरू आहे. नुकतंच झालेलं लग्न कोणत्याही धार्मिक चालीरीती टाळून सामाजिक पद्धतीने संपन्न झालेलं ३५ वं लग्न आहे.
सिरोह जिल्ह्यातील मुल्लानी गावातील दीपक मालवीय हा २३ वर्षीय युवक आणि शाजापूर जिल्ह्यातील लासुडिया गौरी गावातील २२ वर्षीय आरती मालवीय यांच्या विवाहाच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम पुन्हा चर्चेत आलाय.
सिहोरमधील नदी चौराहा येथील मालवीय समाजमंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरीला आणि अग्नीऐवजी संविधानाला साक्षी मानून वधुवरांनी सात फेरे घेतले.
बाबासाहेबांच्या तसबीरीला मालार्पण केल्यानंतर वधुवरांनी एकमेकाला हार घातले. संविधानातील उद्देश्यिकेचं वाचन केलं आणि विवाहपश्चात कर्तव्ये निभावण्याबाबत निर्धार केला. कोविड निर्बंधांमुळे मोजके लोक या सोहळ्याला उपस्थित होते.
संविधानिक हक्कांबाबतची जागृती, संविधानाच्या रक्षणाची शपथ, जबाबदार नागरिक असल्याची भावना निर्माण करणं, विवाहसोहळ्याचं अवडंबर व अनाठायी खर्च टाळून साधेपणाने विवाह व्हावेत, म्हणून प्रसार असा उद्देश डोळ्यासमोर असल्याचं या निमित्ताने राजेश मालवीय यांनी म्हटलंय.
Vilas Kalu Yeshwante
जागृत भारता