मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
शनिवारी दिल्ली विद्यापीठातील पिंजरा तोड ग्रुपच्या दोन मुलींना पोलिसांकडून अटक झालेली आहे. त्यांची नावे देवांगना आणि नताशा असल्याचं कळतंय. त्यांच्यावर CAA कायद्याच्या विरोधात आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप आहे. याआधी विद्यार्थीनेता आसिफ तनहाला पोलिसांनी अटक केली होती.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील प्रशासनाने २०१५ मध्ये एक नोटीस काढून विद्यार्थीनींना रात्री आठ नंतर हॉस्टेल मध्ये प्रवेश बंदी केली होती. ह्या नोटीस विरोधात विद्यापीठातील एका मुलींच्या समुहाने कडाडून विरोध केला आणि पुढे ह्याच विद्यार्थीनींनी आपल्या समुह आंदोलनाला पिंजरा तोड हे नाव दिलं.
आज हा ग्रुप एकाच विद्यापीठापुरता मर्यादित न राहता दिल्लीमधील सगळ्या विद्यापीठातील मुली ह्या ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात सामुहीक आंदोलन उभं राहू लागलं. हळूहळू पिंजरा तोडचा देशातल्या महत्त्वाच्या घटना, घडामोडीविरूद्ध आंदोलनातही सहभाग दिसू लागला.
देशात CAA कायद्याविरोधात जागोजागी मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली त्यात पिंजरा तोडच्या मुलीही मागे नव्हत्या. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या दिल्ली हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन मुलींना शनिवारी अटक करण्यात आली.