मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
गेल्या काही दिवसामध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल सातत्याने राज्य सरकारांना दोषी ठरवताना दिसत आहे.विशेष म्हणजे बिगर भाजपा राज्य सरकारांना ते सतत लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि आता पाळी आलीय झारखंडची !
पियुष गोयल ह्यांच्या म्हणण्यानुसार मजुरांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वे मंत्रायलयाकडून विशेष श्रमिक ट्रेन्स तयार आहेत; पण वर उल्लेखीत राज्ये रेल्वेप्रशासनाला सहकार्य करत नाहीत किंवा ट्रेन्सच्या मागणी करत नाहीत. ट्रेन्स उभ्या आहेत.श्रमिकांना घरी पोहचवण्याविषयी राज्य सरकारे उदासिन आहेत. रेल्वेप्रशासनाच्या ३०० ट्रेन्स तयार असताना राज्य सरकारे का सहकार्य करत नाहीत, असा प्रश्न पियुष गोयल यांनी उपस्थित केला आहे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ह्यांनी पियुष गोयल यांना उत्तर देताना म्हटले आहे की, मा.पियुष गोयल ह्यांच्यापर्यंत नीट माहिती पोहचत नाही. रेल्वेप्रशासनात नियोजनशून्यता असावी. देशात सर्वात अगोदर मजुरट्रेन्सची मागणी झारखंड सरकारने केलेली होती. आम्हाला अधिकच्या ट्रेन्सची आवश्यकता आहे, असं निदर्शनास आणून देखील आमच्यासाठी फक्त ५-६ ट्रेन्सची व्यवस्था केलेली आहे. ती पुरेशी नाही.आम्ही आतापर्यंत ११० ट्रेन्सची NOC रेल्वे मंत्रालयाला दिलेली आहे.
सोरेन म्हणतात, ५० ट्रेन्सनी आतापर्यंत ६० हजार स्थलांतरीत झारखंडमध्ये पोहचले आहेत. राज्य सरकार सहकार्य करत नाही, हा पियुष गोयलांचा आरोप बिनबुडाचा असून देशातली पहिली मजूर ट्रेन तेलंगणा-झारखंड हीच होती.
अजून एका ट्विटमध्ये हेमंत सोरेन म्हणतात –
“ट्रेनची व्यवस्था कराच. गरज पडली तर झारखंडसाठी विमानसेवाही द्यावी. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियेसाठी झारखंड सरकार पूर्णतः तयार आहे.”
ह्या अगोदर पियुष गोयल विरुद्ध महाराष्ट्र सरकार,पियुष गोयल विरुद्ध पश्चिम बंगाल, पियुष गोयल विरुद्ध अशोक गहलोत असा वाद चव्हाट्यावर आला होता. आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ह्यांनीही पियुष गोयल ह्यांचा खोटेपणा उघडा पाडला आहे.