मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटेल, असं नियोजन करण्याचे आदेश सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आढावा बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जिल्ह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात पूर्ण वेळ ऑडीटर नेमावेत, असंही पवारांनी प्रशासनाला बजावलं. प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीनं उपचार मिळावेत यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असं त्यांनी बैठकीत सांगितलं.
आमदारांना कोरोना संसर्गाबाबत १ कोटीपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली असली तरी त्यांनी त्यांचा निधी योग्य पद्धतीनं खर्च करावा, असं सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
गृह विलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होतं. परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गृह विलगीकरण बंद करुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचं संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना यंत्रणेला करतानाच, मोठ्या गावात ३० बेडचे रुग्णालय सुरु करावं तसंच कोविड सेवेतले कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवून त्या पूर्ण करून घ्याव्यात, असंही पवारांनी सांगितलं.
शासकीय तसंच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर व इलेक्ट्रिक ऑडीट करा, सदर ऑडीट सातत्यानं करा, साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरु करावे, यासाठी त्यांच्यासोबत बैठका घ्या, असंही त्यांनी सुचवलं.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा २४ तासात शोध लावून त्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी. जिल्ह्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही, काही नागरिक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत; अशा नागरिकांवर पोलीस विभागामार्फत कडक कारवाई करावी, अशी तंबी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.