अहंगंड जपत राहिलात तर सहज मारले जाल !!!

अहंगंड जपत राहिलात तर सहज मारले जाल !!!

अहंगंड जपत राहिलात तर सहज मारले जाल !!!

मूळ समस्या हिंदुत्त्वाची आहे. भाजपा हा एकच पक्ष हिंदुंच्या बाजूने असून, बाकी सगळे पक्ष हिंदुविरोधी आहेत, मोदी आल्यापासून हिंदुंना (भारतीयांना नव्हे) चांगले दिवस आले आहेत. हा भ्रम लोकांच्या डोक्यातून काढण्याची आवश्यकता असताना, तो अधिकाधिक दृढ होत जाईल, अशी निरर्थक बडबड सुरूच राहिली, तर ती करणाऱ्यांना अल्पकाळ आत्मसमाधान मिळत राहील, आतल्याआत गुदगुल्या होत राहतील, पण राजकीय यश मिळणं अशक्यप्राय आहे.

राजकारण हा बहुमताचा खेळ आहे. तुम्हाला काय वाटतं, यापेक्षा लोकांना काय वाटतं, हे समजून घेऊन वर्तुळ मोठं करणारी योजना आखावी लागेल.‌ मीच योग्य या थाटात, आतल्या गाठीचं षडयंत्री राजकारण समजून न घेता, आपापल्या राजकीय भूमिका रेटून आपण भाजपा विरोधात लढू शकत नाही.‌

संघ-भाजपाविरोधातली लढाई वैचारिक/सामाजिक/सांस्कृतिक आहे. या बाबतीत भाजपाई मंडळींनी समाजात पध्दतशीरपणे मोठी गुंतागुंत करून ठेवली आहे. त्यासाठी लोकांच्या धार्मिक भावनांचा आधार घेण्यात आला आहे. बहुतांशी लोकांना बुध्दीबधीर अवस्थेत घेऊन जाण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. खिल्ली उडवून ती अवस्था अधिक बिकट होत जाईल. ज्यांना भक्त म्हणून हिनवलं जातंय, त्यांच्याशी थेट जाऊन बोलावंच लागेल. सभांतून नव्हे, छोट्या छोट्या बैठकांतून. धर्माभिमानाच्या नादी लागून आपण विनाशाकडे वाटचाल करतोय, हे त्यांना सांगावं लागेल.

भाजपाचा हिंदुत्त्वाच्या आडून चाललेला देशद्रोह सहजसोप्या भाषेत उलगडून सांगावा लागेल. भाजपाई हिंदुत्व आणि हिदूधर्म यातला फरक ठळकपणे अधोरेखित करावा लागेल. अगदी शून्य होऊन. एक शुध्द भारतीय नागरिक म्हणून.

सगळे राजकीय मतभेद, ईझमबिझम बाजूला ठेवूनच ही लढावी लागेल. तथाकथित विद्वत्ता काही काळ बाजूला ठेवून, आपल्या दैनंदिन जीवनमरणाच्या प्रश्नांवरच चर्चा एकवटावी लागेल. मताधिकार बजावायची विचारप्रक्रिया रूजवावी लागेल. राजकीय पक्षांची नव्हे, तर चांगल्या व्यक्तिंची निवड हा निकष लोकांसमोर ठेवावा लागेल.

कायद्याने वागा लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देत सोबत देश, देशाचा कारभार, संविधानिक विचार सांगत मताधिकार बजावायची व जात पात धर्म प्रांत ईझम बिझम पक्षबिक्ष यापलिकडे चांगली माणसं संसदीय प्रणालीत येतील, अशी एक विवेकी विचारप्रक्रिया रूजवायचा प्रयत्न करतोय. विनम्रपूर्वक सांगतो, आज ना उद्या सगळ्यांना याच मार्गावर यावं लागणार आहे. मग आजच का नको?

अहंगंड जपत राहिलात, तर सगळे एकेकजण कोपऱ्यात गाठून संपवले जाल, हे लक्षात असू द्या.


——राज असरोंडकर——-

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक प्रमुख आहेत.


आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद रकान्यात जरूर द्या.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!