मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
संवेदना प्रकाशनच्या ज्येष्ठ कवयित्री आशा पैठणे यांच्या उघडमीट या काव्यसंग्रहाचं प्रकाशन २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता माजी शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते होत आहे. सुप्रसिद्ध कवी देविदास फुलारी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तसंच कवी समीक्षक डॉ. पी विठ्ठल काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत. त्यानिमित्ताने नयन बाराहाते यांनी व्यक्त केलेलं मनोगत…
आशा पैठणे आणि त्यांची कविता यांची माझी काळाची ओळखदेख. कवयित्री आणि कविता या दोघींतील कार्यकारणभाव परस्परांशी इतका तादात्म्य पावलाय, की आशा पैठणे यांची कविता त्यांचे प्राणभूत तत्व बनली आहे.
उघडमीट या काव्यमालिकेत ही अनुभूती ओळीत येते. या कविता हे खरे तर त्यांचे उत्खनन आहे… आपणच आपलं कालानुरूप केलेलं उत्खनन.
पण हे उत्खनन करताना त्यांनी छिन्नी-हातोड्यांचे प्रहार केले नाहीत…हळुवार फुंकर मारून चाफ्याचा देहगंध उकलावा तसं हे उत्खनन. अपरंपार वात्सल्य आणि कंगोरे असलेल्या काचा जोडून काचकमळ बनवायची सुकुमार वृत्ती हा त्यांच्या कवितेचा मन्योन्यास !
यामुळे त्यांची कविता पिसं उपसताना होणार्या वेदनेसारखी मर्मभेदी तर आहेच, शिवाय ही उसासणाऱ्या दुःखाची वैश्विक प्रतिनिधीसुद्धा आहे.
असे जगावे असे जगावे
नभास अपुले हात पुरावे
असे जगावे असे जगावे
सुमंगलाचे कलश भरावे
असा विपश्य ‘आशा’वाद व्यक्त करणारी त्यांची कविता उदबत्तीचा ‘आर्टिफिशल फ्रॅग्नन्स’ सहनही करीत नाही, मात्र मोहफुलांच्या मोहात पडते. या अनाकलनीय स्वभावधर्मामुळे ती अधिकाधिक मानवीय वाटते. भरगच्च मजकूर लिहिलेल्या ‘कोऱ्या’ कागदांची संचिका बनून जाते आशाताईंची कविता ! कुडीत लेखणी बुडवून काळीजलिपीची उजळणी केल्यासारखी
(सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार कवी लेखक व्याख्याता)