मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
संपूर्ण भारतभरात आज रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाला अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात. कोणी मानो न मानो, परंतु वर्तमानात जातीधर्माच्या पलिकडे रक्षाबंधनाचा उत्सव भाऊबहीण साजरा करतात. मात्र दिल्ली भाजपाचे प्रवक्ता खेमचंद शर्मा यांनी त्याला ब्राह्मणांचा उत्सव असं संबोधणारं ट्वीट केल्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
मात्र खेमचंद शर्मा यांनाच अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. आधीच जातिव्यवस्थेमुळे भारत पोखरला गेला असताना आता सण-उत्सवांना जातीपातीमध्ये विभागू नका, असं कित्येक ट्विटर वापरकर्त्यांनी खेमचंद शर्मा यांना सुनावलं आहे ; मात्र सण-उत्सव हे सगळ्यांचे असले तरी रक्षाबंधन ब्राह्मणांसाठी खास आहे, यावर खेमचंद शर्मा अडून राहिले.
त्यांनी एका वृत्तपत्रीय बातमीचा संदर्भ दिला. त्या बातमीत भारतातले उत्सव चार वर्णांमध्ये कसे विभागले गेले आहेत, हे सांगितलेलं आहे.
खेमचंद शर्मा यांनी ज्या बातमीचा संदर्भ दिलाय ती बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानुसार श्रावणातील पवित्र महिन्यात पहिला येणारा राखी उत्सव ब्राह्मणांचा, विजयादशमी क्षत्रियांची, दीपावली वैश्याची तर एकमेकांस रंगचिखल फासायचा होळी शूद्रांचा सण असल्याचं म्हटलेलं आहे.
या संदर्भामुळे गोंधळात अजूनच भर पडली आहे. प्रसिद्ध पत्रकार दिलीप मंडल यांनी संधी साधत भारतातील समाज व्यवस्थेवर हल्ला चढवला आहे.
‘आम्हाला हे आधीपासून माहित होतं, भाजपाच्या प्रवक्त्यांनी हे गुपित खुलं केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन !’ असा टोला दिलीप मंडल यांनी लगावला आहे. त्यांनी समस्त ब्राह्मण समाजाला रक्षाबंधनाच्या सदिच्छा दिल्या आहेत. शिवाय ज्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या व स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतलं, त्यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थनाही केली आहे.