मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
१९ डिसेंबर १९६१ तो हाच दिवस होता ज्या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या अंमलातून मुक्त झाले आणि भारताचा तिरंगा येथे सर्वप्रथम फडकवण्यात आला. ई. स. १५१० साली गोव्यात आपलं साम्राज्य उभारण्यास सुरुवात केलेल्या पोर्तुगिजांनी तब्बल ४५१ वर्ष गोव्यावर राज्य केले.
भारतीय सैन्यातील ३०००० पायदळ आणि नौदल सैनिक यांनी अवघ्या ४८ तासात गोव्यातून पोर्तुगिजांना पळवून लावत, गोयेंकराना स्वतंत्र भारतातील मुक्त श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, तोच आजचा दिवस, १९ डिसेंबर १९६१.
या सर्व धुमश्चक्रीत २२ भारतीय आणि ३० पोर्तुगिज सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले.
नाटो देशांशी संघर्ष टाळण्यासाठी भारताने गोवा विलीनीकरण संदर्भात काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. ज्या पोर्तुगीजांचे गोव्यावर राज्य किंबहुना वर्चस्व होते तो पोर्तुगाल हा नाटो देशांपैकी एक होता. त्यामुळे भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला तरी गोवा परकीय सत्तेपासून मुक्त होण्यासाठी आणखी १४ वर्ष वाट पाहावी लागली.
परंतु पोर्तुगीज आणि भारत सरकार यांच्यात निराकरण न झालेले संवाद आणि गोव्याच्या समुद्रात भारतीय मच्छिमारांच्या हत्येमुळे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुक्तीचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले.
परंतु आजच्या दिवशी परकीय सत्तेतून मुक्त होणारं गोवा हे केवळ एक राज्य नव्हतं. गोव्या सोबत दीव दमन हे आजचे केंद्र शासित प्रदेश देखील होते.
दीव दमण हे अद्याप केंद्र शासित प्रदेश आहेत, गोवा सुद्धा १९८७ पर्यंत केंद्र शासित प्रदेश म्हणून ओळखला जात असे. गोवा संपूर्ण राज्य म्हणून अस्तित्वात आले १९८७ नंतर.
आजच्या दिवशी गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथील आझाद मैदानावर पथसंचलनासोबतच ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जातो.
आज पोर्तुगिजां पासून गोवा राजकीय दृष्ट्या मुक्त झालेलं आहे. त्याला आज जवळपास ६० वर्ष पूर्ण होत आली. परंतु गोव्याच्या जीवनपद्धतीत पोर्तुगिज खाद्य पद्धती, कलाकुसर, स्थापत्य, संगीत याचा पुरेपूर प्रभाव जाणवतो…
गोयेंकरापासून पोर्तुगिज की पोर्तुगिजापासून गोयंकर त्या अर्थी मुक्त झालं का, याचं उत्तर अजून सापडत नाही..
वास्को, गोवा
लेखक सामजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते आहेत.