मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सरकार कोविड मृत्यूसंबंधीची माहिती दडवत असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर खुलासा करण्याची पाळी आली आहे. कोविड रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासनाकडून या माहितीची स्वत:हून फेरतपासणी केली जातेय. समायोजन केलेली माहिती वेबपोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असं स्पष्टीकरण राज्य शासनाला करावं लागलं आहे. अखेर सत्य बाहेर आलेच, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या ICD-१० मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही करण्यात येत असल्याचं व त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी म्हटलं आहे.
त्यानुसार तसेच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्चपासून COVID19 प्रकरणांची पडताळणी व त्यानुसारच समायोजन करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासनाकडून ११ जून रोजी जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात १५ जूनपर्यंत १ लाख १० हजार ७४४ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, त्यापैकी ५० हजार ५५४ ॲक्टिव्ह रुग्ण तर ४ हजार १२८ मृत्यूंची नोंद आहे. तसेच ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्य शासनाकडून या माहितीची फेरतपासणी करण्यात आल्यावर त्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन ८६२ मृत्यू, तर राज्यात ४६६ अधिकचे मृत्यू आढळले. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्यूसमयी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटिव्ह म्हणून घेण्यात आली.
अखेर सत्य पुढे आलेच…! मुंबईत ८६२ आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. असे एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे!!!
– देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते
फेरतपासणीत अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी मृत्यूसंख्या आढळून आल्याची माहिती शासनाच्या माहिती संचालनालयाने दिली आहे.
News by MediaBharatNews Team