मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आहेत. कापूस उत्पादक शेतक-यांसाठी काही महत्वाच्या उपाययोजना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
१) राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून कुठल्याही परिस्थितीत एफएक्यु कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल. त्यासाठीचे नियोजन झाले असून संबंधित कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील.
२) राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हाउपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेशापर्यंत सुरू राहतील.
३) चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूसखरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून याबाबत व्यवस्था करणार आहेत.
४) राज्यात २०१९-२० मध्ये उत्पादित एकूण ४१० लाख क्विंटल पैकी केंद्रीय कापूस महामंडळ व त्यांच्या वतीनं कापूस पणन महासंघानं १८८ लाख १७ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खासगी व्यापाऱ्यांनी सुमारे १९८ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. एकूण ३८६ लाख १७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
News by MediaBharatNews Team