मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
देशात एखाद्या मुस्लिम व्यक्तिची हिंदुत्ववादी झुंडींनी हत्या केल्यानंतर त्याविरोधात वातावरण बनू लागलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दोन विषय नेहमी पुढे केले जातात. एक काश्मीरी पंडीत आणि दुसरा केरळात कम्युनिस्टांकडून संघाच्या कार्यकर्त्याची हत्या ! पण केरळातील कोल्लम न्यायालयाने नऊ आरोपींना जन्मठेप सुनावल्याच्या निकालामुळे रास्वसंघातील गुन्हेगारी संघर्ष उघड करणारं एक हत्याप्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
२०१२ मध्ये केरळात जयन कदावूर उर्फ राजेश या रास्वसंघाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती. जयनवरचा हल्ला अत्यंत क्रूर होता. त्याच्या शरीरावर एक-दोन नव्हे तर ५० वार होते. हत्या झुंडींनी केली होती आणि झुंडींची प्रवृत्ती तीच होती, जी गायींच्या श्रद्धांचा बहाणा करून मुस्लिमांवर हल्ला करते आणि त्यांना जीवानिशी मारते. जयनवर हल्ला करणारे आरोपीही रास्वसंघाचेच स्वयंसेवक होते.
जो मुख्य आरोपी होता, विनोद कदावूर, त्याला जयननेच संघटनेत आणलं होतं. पण हळुहळू त्यांच्यात बेबनाव होऊ लागला. विनोदचा डोळा एका मंदिर समितीवर होता, जिथे जयन अध्यक्षपदी होता.
रास्वसंघाच्या सगळ्या प्रचारात देव, धर्म, मंदिर, श्रद्धा हे केंद्रस्थानी असतं. पण याच मंदिरांवर कब्जा मिळवण्यासाठी त्यांच्यात आपसांत जीवघेणी स्पर्धा कशी असते व ती कुठल्या थराला जाते, ते जयन हत्येसारख्या घटनांतून दिसून येतं. व्यवस्थित कट करून विनोद आणि त्याच्या गुंडांनी जयनवर हल्ला चढवला.
या हत्या प्रकरणातील विनोदसोबतच्या गुंडांमध्ये काही जण तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांना केएपीए हा केरळातील गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा वापरून स्थानबद्ध करण्यात आलं होतं. ते काही महिन्यांतच बाहेर आले.
आश्चर्यकारकरित्या, संघाच्या ह्या आरोपी स्वयंसेवकांना केरळातील तत्कालीन काँग्रेस सरकारातील नेत्यांचं पाठबळ होतं, असं देशाभिमानी या दैनिकात छापून आलंय.
एका संघ कार्यकर्त्याच्या हत्येतील आरोपी असतानाही विनोद कालांतराने त्याच मंदिरातील सल्लागार समितीचा अध्यक्ष बनला, ज्या पदावर जयन कदावूर होता.
आठ वर्षांनंतर आता कोल्लम न्यायालयाने विनोदसह नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींपैकी दोघांना कोविडबाधा झाल्याने, कोल्लम न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस सुरेश कुमार सी यांनी दुरदृश्यप्रणाली द्वारे ही शिक्षा ठोठावली आहे.
त्याचबरोबर न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी ७१५०० रुपयाचा दंडही ठोठावला होता. जो भरण्यास नऊही आरोपी असमर्थ ठरल्यामुळे त्यांना आणखी ४ वर्षाचा वाढीव कारावास भोगावा लागणार आहे. आरोपी विनोद, गोपकुमार, सुब्रह्मण्यन, प्रियराज, प्रणव, अरुण, रजनीश, दिनराज आणि शिजू हे सगळे रास्वसंघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
जुलैमध्ये तामिळनाडूत गोपालकृष्णन नावाच्या वयोवृद्धाची हत्या झाली. मयताचा मुलगा रास्वसंघाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या हत्येला धार्मिक रंग देऊन संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर विखारी संदेश पसरवले. पण मागाहून या हत्येत एका भाजपा कार्यकर्त्याचा सहभाग असल्याचं दिसून आलं. मालमत्ता वादातून ही हत्या करण्यात आली होती.
रास्वसंघाने प्रतिष्ठेच्या केलेल्या अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठीचं भूमीपुजन नुकतंच झाल़ं आणि त्या पार्श्वभूमीवर केरळात मंदिरावर कब्जा मिळवण्याच्या जीवघेण्या शत्रुत्वातून झालेल्या रास्वसंघाच्या स्वयंसेवकाच्या हत्येत रास्वसंघाच्याच स्वयंसेवकांना जन्मठेप झाल्याचा निकाल लागल्याने संघाची मोठी कोंडी झाली आहे.